‘सातबारा’, ‘आठ-अ’ साठी फरफट
By Admin | Updated: July 31, 2015 02:18 IST2015-07-31T02:18:44+5:302015-07-31T02:18:44+5:30
नापिकी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे.

‘सातबारा’, ‘आठ-अ’ साठी फरफट
महसूल विभागाचा प्रताप : कर्जबाजारी शेतकऱ्याच्या तीन वर्षांपासून चकरा
आर्वी : नापिकी व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदूपर येथील चंद्रशेखर मनोहर देशमुख या कर्जबाजारी शेतकऱ्याचा सातबारा व आठ अ गत तीन वर्षांपासून महसूल विभागाने दिला नाही. या शेतावर अडीच लाखांचे कर्ज आहे. शेत विकून हे कर्ज फेडू, असा शेतकऱ्याचा मानस होता; पण सातबाराच जवळ नसल्याने शेत विकात आले नाही. या विवंचनेत अन्यायग्रस्त शेतकऱ्याने महसूल प्रशासनाने आत्महत्या करण्याची वेळ लेखी तक्रारीतून केला आहे.
तालुक्यातील नांदपूर येथील चंद्रशेखर मनोहर देशमुख यांच्याकडे ११ एकर शेतजमीन आहे. या जमिनीचे अमरावती येथील न्यायालयात प्रकरण सुरू होते. या जमिनीची जप्ती व विक्री करण्यासाठी ४ एप्रिल २०१२ रोजी लिलाव ठेवण्यात आला होता; पण यातील १७ हजार रुपये न्यायालयास अदा करण्यात आले. यानंतर न्यायालयाने लिलाव स्थगित करीत जमीन जप्ती व विक्रीचा वारंट रद्द केला. यावेळी तत्कालीन तहसीलदार कैलूके यांना अर्ज करून जमीन परत करून सातबारा व आठ अ देण्याबाबत शेतकऱ्याने विनंती केली; पण जमिनीचा सातबारा, आठ अ देण्यास टाळाटाळच करण्यात आली.
या प्रकरणात शेतकरी देशमुख यांची शेतजमिनी न्यायालयाने तहसील कार्यालयामार्फत लिलावात काढली असता १ लाख ७६ हजार रुपये अदा करण्यात आले. यानंतरही तहसील कार्यालयातून शेतजमीनीचा सातबारा दिला जात नसल्याचा आरोप पीडित शेतकऱ्याने केला आहे.
सदर शेतकऱ्यावर सहकारी बँकेचे २ लाख १५ हजार रुपयांचे आणि स्टेट बँक आॅफ इंडियाचे १ लाख १५ हजार रुपयांचे कृषी कर्ज थकित आहे. या दोन्ही बँका वारंवार नोटीस पाठवून कर्ज अदा करण्यास सांगत आहे. या सर्व प्रकरणांत आर्वी न्यायालयाने २ लाख ३३ हजार ३९६ रुपये भरणा करण्यास सांगितले. यानुसार सदर शेतकऱ्याने महसूल विभागाकडे सातबारा व आठ अ मिळण्यासाठी १७ मार्च २०१५ रोजी लेखी अर्ज केला. शेती विकून कर्ज फेडता येईल म्हणून शेतकऱ्याने दोन्ही प्रमाणपत्रांची मागणी केली होती; पण ते अद्यापही देण्यात आले नाही. शिवाय तीन वर्षांपासून पर्यायही देण्यात आलेला नाही. सदर शेतकरी तीन वर्षांपासून महसूल कार्यालयाच्या चकरा मारत आहे. महसूल विभागाने सातबारा परत न केल्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे शेतकऱ्याने तक्रारीत नमूद केले आहे.
आॅगस्ट महिन्यात सदर शेतकऱ्याच्या शेतजमिनीचा लिलाव असल्याने तत्पूर्वी आत्महत्या करण्याचा इशाराही पीडित शेतकऱ्याने दिला आहे. लिलावात काढलेली शेती विकल्यावर जगणार कसा, असा सवालही शेतकऱ्याने निवेदनातून केला आहे. महसूल विभागाने याकडे लक्ष देत पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही शेतकऱ्याने निवेदनातून केली आहे.(तालुका प्रतिनिधी)