कृषिपंपाचे पाणी कारखानदारांच्या घशात
By Admin | Updated: January 3, 2015 01:57 IST2015-01-03T01:57:27+5:302015-01-03T01:57:27+5:30
येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील साईनगर, राधिकानगर, गजानननगरी व इतर विहिरींचे पाणी अवैधरीत्या नेण्यात येत आहे.

कृषिपंपाचे पाणी कारखानदारांच्या घशात
देवळी : येथील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी शहरातील साईनगर, राधिकानगर, गजानननगरी व इतर विहिरींचे पाणी अवैधरीत्या नेण्यात येत आहे. पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने या भागात पाणी टंचाईची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. समस्येबाबत तहसीलदार व न.प. मुख्याधिकारी यांना अवगत करून सुध्दा संबंधीतांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांत रोष आहे.
येथील एमआयडीसीतील एकट्या महालक्ष्मी स्टील इंडस्ट्रीज मध्ये दररोज १ हजार २०० मे.टन लोखंडाची निर्मिती होत असून यासाठी हजारो लीटर पाणी उपयोगात येत आहे. याव्यतिरीक्त अनेक कारखाने याठिकाणी कार्यरत असल्यामुळे पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. तिथे टॅँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांचे उखळ पांढरे होवून लाखोंची उलाढाल होत आहे. कृषीपंप व सार्वजनिक वापरासाठी असलेले पाणी कारखानदारांच्या घशात जात आहे. हा सर्व प्रकार अवैध गौण खनीजांच्या चोरीमध्ये मोडत असल्याने संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे. (प्रतिनिधी)