कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:07 IST2015-06-26T02:07:08+5:302015-06-26T02:07:08+5:30

गत अनेक वर्षांपासून पेरण्या उलटणे, दुबार-तिबार पेरणी करणे या कटू अनुभवामुळे शेतीत वैतागलेल्या शेतकऱ्यांना यंदा पेरणीच्या वेळी वरुणराजाने योग्य साथ दिली.

Farmers' walk continued for loans | कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

कर्जासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरूच

गहाण खतासाठी खर्चिक प्रक्रिया अडचणीची
रोहणा : गत अनेक वर्षांपासून पेरण्या उलटणे, दुबार-तिबार पेरणी करणे या कटू अनुभवामुळे शेतीत वैतागलेल्या शेतकऱ्यांना यंदा पेरणीच्या वेळी वरुणराजाने योग्य साथ दिली. यामुळे परिसरातील कापूस, तूर, सोयाबीनच्या पेरण्या साधल्या आहेत. याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत असले तरी कर्जाचे पुनर्गठन व त्यातील शेती गहाण करून देण्याची खर्चिक प्रक्रिया यामुळे अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले नाही. परिणामी, बँकाच्या दिशेने होणारी पायपीट सुरूच आहे.
पेरण्या साधल्या तर उत्पन्नही चांगले येते, या अनुभवामुळे शेतकऱ्यांत उत्साह दिसतो. पेरण्या साधल्या तरी खते व किटकनाशके यांची व्यवस्था व मजुरांची मजुरी देण्यासाइी शेतकऱ्यांना बँक कर्जाची मोठी गरज असते. एक वर्षाच्या थकित कर्जाचेच पुनर्गठण होईल, त्यापेक्षा अधिक वर्षाच्या थकित कर्जाचे पुनर्गठण होणार नाही, ही अट अडसर ठरत आहे. एक लाखापेक्षा अधिक कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांना जमीन गहाण करून देणे अनिवार्य आहे. यासाठी खर्च अधिक व प्रक्रिया वेळखाऊ असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. हा खर्च २० हजार रुपयांपर्यंत जात असल्याने अनेक शेतकऱ्यांची नाकापेक्षा मोती जड, अशी अवस्था बँकेने केली. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. परिणामी, अद्याप बँकांचे कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ५० टक्केही पूर्ण झाले नाही. केवळ ३५ टक्के शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले. उर्वरित शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.
पीक कर्ज वाटपासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जाते. असे असले तरी बँकांमध्ये कर्ज वाटपाबाबत असलेली उदासिनता शेतकऱ्यांना अडचणीची ठरत आहे. यामुळे किती शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होऊ शकेल, हा प्रश्नच अनुत्तरीत आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत बँकांना निर्देश द्यावे व शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचा मार्ग मोकळा करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)

Web Title: Farmers' walk continued for loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.