शेतकरी पुत्रांना बळ देण्याचे काम व्हायला हवे!
By Admin | Updated: February 2, 2016 02:00 IST2016-02-02T02:00:18+5:302016-02-02T02:00:18+5:30
शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती दयनिय आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने झाली. अनेक संघटना काम करीत आहेत.

शेतकरी पुत्रांना बळ देण्याचे काम व्हायला हवे!
किशोर माथनकर : ‘शेतकरी समस्या व विविध संघटनांची वाटचाल’ विषयावर परिसंवाद
सेवाग्राम : शेती आणि शेतकऱ्यांची स्थिती दयनिय आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने झाली. अनेक संघटना काम करीत आहेत. आंदोलनाचा अभ्यास असणारी मंडळी आपल्यात आहे. सरकारच्या धोरणांची जाण असणाऱ्या मंडळींनी नव्या दमाच्या युवकांना मदत व मार्गदर्शन करून शेतकऱ्यांमधून उभे राहणाऱ्या नव्या युवकांना बळ देण्याचे काम व्हावे, असे मत किशोर माथनकर यांनी व्यक्त केले.
आश्रम प्रतिष्ठान सेवाग्रामद्वारे पुरस्कृत कृषी व पशु प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी ‘शेतकरी समस्या व विविध शेतकरी संघटनांची वाटचाल’ विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. कार्यक्रमाला भूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे अभिजीत पावडे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या या पिढीला गांधी विनोबांचे स्वप्न पूर्ण करायचे असून या जागेपासून सुरू करावे, असे माथनकर यांनी सांगितले. पावडे यांनी शेती प्रश्नावर विचार करता शाळा, महाविद्यालयात हा विषय आहे काय? शोषण व्यवस्थेचा बळी शेतकरी ठरला. यासाठी त्याला अज्ञानी व गरीब ठेवले गेले. या देशात महामानवांनी शेती व शेतकरी उत्थानाचा मार्ग दाखविला; पण शिक्षणाचा अभाव व आंदोलनांवर विश्वास नसल्याने शेतकरी मागे राहिला. शेती व्यवस्था व अर्थशास्त्र न समजणारे देश चालवित आहे. शोषणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. व्यवस्थेविरूद्ध लढणाऱ्या संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. काकडे यांनी व्यवस्थेतील संघर्ष इतिहासात दिसतो, असे सांगितले.
भूमिपुत्र व आपुलकीतर्फे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील माधुरी गजम काकडा, प्रियंका कांबळे आगरगाव, सविता भोमले आष्टा, रेखा वाटगुळे पवनार तसेच गरजू उत्तम ताकसांडे, भाऊराव चांदोरे, प्रभाकर आळणकर यांना शिलाई मशीन व स्प्रे-पंप दिले गेले. संचालन संजय काकडे यांनी केले. प्रशु प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. जयवंत मठकर, श्रीराम जाधव, बाबा खैरकार, नामदेव ढोले आदी उपस्थित होते.(वार्ताहर)
गांधी विनोबांचा विचार खेड्यात पोहोचावा
गांधी, विनोबांचा विचार खेड्यात गेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फुटणार नाही. सरकार सातवा वेतनमान लागू करणार आहे; पण शेतकऱ्यांचे काय? किमान जगण्याएवढा हमीभाव व ५० टक्के नफा, ही मागणी आहे. सेवाग्राम ते साबरमती यात्रा काढून गांधी, विनोबांच्या कार्याचा विचार पोहोचविणे गरजेचे असल्याचे मत विजय जावंधिया यांनी मांडले.
कृषी मेळाव्यात २०१९ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असून त्यानिमित्त सेवाग्राम आश्रम ते राजघाट नवी दिल्ली, दिल्ली ते साबरमती आश्रम गांधीनगर, अशी शेतकरी आक्रोश यात्रा काढली जाईल. विजय जावंधिया नेतृत्व करतीलव विविध शेतकरी संघटना सहभागी होतील, हा निर्णय झाला.