शेतकऱ्यांनो, उमेद कायम ठेवा!
By Admin | Updated: February 20, 2016 02:59 IST2016-02-20T02:59:26+5:302016-02-20T02:59:26+5:30
शेतकऱ्यांना अनंत यातना सहन करून शेती करावी लागते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हाती येण्याची शक्यता कमीच असते.

शेतकऱ्यांनो, उमेद कायम ठेवा!
शेतकऱ्यांशी साधला ज्येष्ठ नागरिकांनी संवाद
वर्धा : शेतकऱ्यांना अनंत यातना सहन करून शेती करावी लागते. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हाती येण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. आयुष्य तर जगावेच लागते. कितीही संकटे आल्यास हताश होऊ नका, नकारात्मक विचारांना थारा देऊ नका, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेख हाशम यांनी केले.
आधारवड ज्येष्ठ नागरिक परिवाराच्यावतीने महाकाळ येथे गावकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आधारवड परिवार या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात येता. याच उपक्रमाचा भाग म्हणून हा संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रभाकर पाटील, जलतरणपटू गिरीश उपाध्याय, अॅड. अशोक वाघ, कामगार नेते गुणवंत डकरे, विनायक बोरसे, परिवाराचे अध्यक्ष श्यामकांत देशपांडे उपस्थित होते.
बदलत्या आर्थिक धोरणांमुळे गावखेडी भकास होत आहेत. शेतीव्यतिरिक्त रोजगाराचे अन्य साधन नसल्याने युवक निराश झाले आहेत. सध्या स्मार्ट सीटी या विकास संकल्पना माध्यमांमधून पुढे रेटल्या जात आहे. याचे खरे स्वरूप कसे राहील. याबाबत मतभिन्नता आहे. मात्र हा देश कृषिप्रधान असल्याने स्मार्ट व्हिलेजला आधी प्राधान्य दिले पाहिजे. कारण गावे जगतील तरच शहरे जगतील, अन्यथा नव्या विकास संकल्पनांना काहीच अर्थ उरणार नाही. भारताचा विकास करण्यासाठी गाव हाच केंद्रबिंदू असला पाहिजे, असेही हाशम पुढे म्हणाले.
आधारवड परिवाराच्यावतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावागावात भेटी देण्यात येत आहे. शिक्षणातून व्यक्तिमत्व विकासासोबतच स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण कसे देता येईल. याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हित लक्षात घेऊन काही नव्या उपक्रमांची आखणी करण्यात येईल, अशी माहिती श्यामकांत देशपांडे यांनी दिली. शेतीचा व्यवसाय संकटात आल्याने शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले. ज्येष्ठ नागरिकांनी शेतकऱ्यांंना मदत करण्यासाठी वेळा काढावा. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी सर्वांनीच योगदान द्यावे, असे आवाहन केले.
प्रभाकर पाटील यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध ग्रंथांचे वाचन करण्याची प्रेरणा दिली. गिरीश उपाध्याय, गुणवंत डकरे यांनीही शेतीप्रश्नांची माहिती जाणून घेतली. तसेच शासकीय योजनांबाबत जागरुक राहण्याचे आवाहन केले. यावेळी सभेला उपस्थितांनी त्यांच्या समस्या मांडल्या. आयोजनासाठी प्रभाकर लिखितकर, सरपंच पुरुषोत्तम टोणपे आणि गावकऱ्यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
गावखेड्यांत विकासाचा अभाव
शहरात राहणाऱ्या नागरिकांना गावखेड्यांतील समस्यांची जाणीव नाही. प्रचंड संकटे सहन करून गावकरी आयुष्याचे दिवस पुढे ढकलतात. विकासाच्या शहरी गप्पा गावकऱ्यांच्या दृष्टीने पोकळ ठरल्या असून शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत, असे निरीक्षण आधारवडच्या सदस्यांनी नोंदविले. शासनाने विकासाचे नियोजन करताना गावकऱ्यांशी सुसंवाद साधावा अन्यथा या योजनांना अर्थ उरणार नाही, असे मत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.