शेतकरी आत्महत्या; सात प्रकरणे मंजूर
By Admin | Updated: April 8, 2016 02:03 IST2016-04-08T02:03:32+5:302016-04-08T02:03:32+5:30
शेतकरी आत्महत्यासंदर्भातील जिल्ह्यात फेब्रुवारीपासून झालेल्या आठ प्रकरणांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन सात आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या; सात प्रकरणे मंजूर
जिल्हास्तरीय समितीची बैठक : विविध योजनांचा लाभ देण्याच्या सूचना
वर्धा : शेतकरी आत्महत्यासंदर्भातील जिल्ह्यात फेब्रुवारीपासून झालेल्या आठ प्रकरणांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीने निर्णय घेऊन सात आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरविल्या आहेत.
यामध्ये वर्धा तालुक्यातील करंजी (भोगे) येथील विशाल अंबादास पवार, धानोरा येथील आशिष नरेश चौधरी, वाठोडा(धामणगाव) येथील संदीप वाटकर, हिंगणघाट तालुक्यातील येरला येथील मंजुळा ताजने, देवळी तालुक्यातील इंझाळा येथील भावना शरद डहाके, पळसगाव येथील अरूण विठोबा ढोके, कारंजा तालुक्यातील बोरीच्या सुंदराबाई धनराज बैगने या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आल्या आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी आत्महत्यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हास्तरीय समितीचे सदस्य डॉ. नंदकिशोर तोटे, अनिल मेघे, देवळी पं.स. चे भगवान भरणे, आर्वी पं.स. सभापती तारा तुमडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर भारती, महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे, डॉ. नितीन निमोदिया, अग्रणी बॅँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजय जांगडा व समितीचे सदस्य उपस्थित होते. नैराश्यातील शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विभागप्रमुखांनी पुढाकार घेण्याच्या सूचना दीपक नलवडे यांनी उपस्थित अधिकारी यांना दिल्या.(स्थानिक प्रतिनिधी)