शेतमालाचे भाव घसरले; शेतकरी हतबल
By Admin | Updated: June 16, 2014 23:40 IST2014-06-16T23:40:37+5:302014-06-16T23:40:37+5:30
लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने

शेतमालाचे भाव घसरले; शेतकरी हतबल
वायगाव(नि.) : लोकसभा निवडणूक संपताच शेतमालाचे भाव वाढणार अशी आशा शेतकरी वर्गाला होती. मात्र सोयाबीन कपाशी, चणा, तूर आदी पिकांचे भाव गत काही दिवसात कोसळले आहे. पेरणीच्या तोंडावर असे झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आधारभूत किंमती पेक्षाही कमी भावात खरेदी केली जात असल्याने नुकसान होत आहे.
केंद्र शासनाने जाहीर केलेल्या हमीदराच्या वर शेतमालाची खरेदी करणे बंधनकारक आहे. पण सर्वत्र शेतमालाचे भाव कोसळले असून ते आधारभूत किंमतीच्या खाली आले आहे. अवकाळी पावसाने शेतमालावर चांगलाच मार बसला. सोयाबीन अत्यल्प भावाने विकावे लागले. मार्च महिना संपताच सोयाबीनचे भाव झपाट्याने वाढले. ४ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत ते पोहचले. लोकसभा निवडणुकीपर्यंत ते स्थित होते. निवडणूक संपताच ते घसरत ३ हजार ९०० ते ४ हजार पर्यंत कोसळले. पेरणीसाठी सोयाबीन घ्यायला गेल्यास शासकीय कंपनीची ३० किलोची बॅग घेण्यासाठी अंदाजे २ हजार ३०० रुपये मोजावे लागते. त्याचप्रमाणे तूर निवडणुकीदरम्यान ५ हजार रुपयांपर्यंत पोहचले होते. निवडणूक संपताच ते ३ हजार ते ३ हजार ८०० रुपये क्विंटल पर्यंत घसरले. लागवडीसाठी तूर खरेदी करताना मात्र प्रती किलो १२० ते १३० रुपये भावाने विकत घ्यावे लागत आहे. गत वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने व शासनाने चन्याची आधार भूत किंमत ३ हजार १०० रुपये केल्याने चण्याचा पेऱ्यात शेतकऱ्यांनी वाढ केली. निवडणुकीदरम्यान चना २ हजार ८०० ते ३ हजार १०० रुपयापर्यंत पोहचला निवडणूक संपताच चण्याचे भाव चांगलेच घसरून ते १ हजार ८०० ते २ हजार ३०० पर्यंत येऊन पोहचले. तसेच कापूस निवडणुकीच्या आधी ५ हजार ४०० रुपये होता. निवडणूक संपताच कापसाची किंमत ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपयांपर्यंत येऊन पडली. वखरणी, डवरणी, तसेच बियाणे, खत व मजुरीचे दर गगणाला भिडले आहे. त्यात नैसर्गिक आपत्तीला तोड देता देता शेतकरी पुरता दमून गेला.
नवा गडी नवा राज यामुळे नव्याने शासन बसल्यावर शेतमालाचे भाव वाढतील अशी आशा शेतकरी वर्गाला होती. आपले अच्छे दिन येतील असे त्याला वाटत होते. पण तसे झाले नाही.
देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी पूर्णत: हालावला गेला आहे. निवडणुकीच्या आधी सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांचे हित असल्याचा दावा करीत होते. पण निवडणूक संपताच त्यांचे शब्द हवेत विरले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. पण मशागतीला लावण्यासाठी त्याच्याकडे पैसा नाही. बँका कर्जपुरवठा करण्यास तयार नाही. त्यामुळे पैसा कसा आणि कुठून तयार करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. त्यातच शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाला आहे.(वार्ताहर)