सुविधांचे विविधा केंद्र दलालांच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2015 02:10 IST2015-06-26T02:10:54+5:302015-06-26T02:10:54+5:30
विविध कागदपत्रांकरिता शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याकरिता येथील प्रशासकीय ...

सुविधांचे विविधा केंद्र दलालांच्या विळख्यात
वर्धा : विविध कागदपत्रांकरिता शालेय विद्यार्थ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळण्याकरिता येथील प्रशासकीय भवनाच्या परिसरात नागरिकांच्या सुविधांकरिता विविधा केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रातील सुविधांचा लाभ घेणे आता नागरिकांकरिता डोकेदुखी ठरत असल्याचे बघायला मिळाले. केंद्रावर थेट गेल्यावर नागरिकांना लाभ मिळणे कठीण झाले आहे. तर दलालांमार्फत गेल्यास कुठलाही त्रास न होता काम होत असल्याचे वास्तव समोर आले. या केंद्राला दलालांच्या विळख्याने पुरते ग्रासल्याचे विदारक चित्र आहे.
विविधा केंद्राच्या इमारतीच्या आत तर दलालांची पंगत बघायला मिळाली. इमारतीच्या दारातून आत शिरताच डाव्या बाजूला दलाल चक्क टेबल घेवून बसून होते. त्यांच्याकडून काय पाहिजेपासून विचारणा सुरू होती. त्यांना तुम्ही तुमचे काम सांगा ते किंमत सांगतील. यात तुमचा सौदा झाल्यास तुम्हाला कामाकरिता खस्ता खाव्या लागणार नाही. मात्र या दलालांव्यरिक्त तुम्ही गेले तर तुम्हाला केंद्रात चकरा मारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणारा नाही, अशी येथील अवस्था आहे.
केवळ इमारतीतच नाही तर इमारतीच्या परिसरात या दलालांकडून विद्यार्थी हेरण्याचे काम सुरू होते. त्यांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांकडून शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत रक्कम घेण्याचे प्रकार सुरू आहेत. इमारतीच्या बाहेर तर काही दलालांली टेबल लावून दुकान थाटले आहे. तर काहींनी येथे उभ्या असलेल्या गाड्यांवर बसून आपली दुकाने थाटली आहेत. वडिलांकडून मोजके पैसे घेत असलेल्या या विद्यार्थ्यांकडून या दलालांमार्फत रक्कम लुटण्याचे काम बिनधास्त सुरू आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता विविध प्रमाणपत्राची गरज असते. या प्रमाणपत्राशिवाय प्रवेश मिळणे कठीण जाते. आवश्यक प्रमाणपत्र मिळविण्याकरिता असलेला कालावधी अत्यल्प असल्याने येथे एकाच वेळी विद्यार्थ्यांची झुंबड उडत आहे. त्याचा लाभ घेण्याकरिता अधिकाऱ्यांच्या संपर्कात असलेले दलाल येथे सक्रीय झाले आहेत. विविधा केंद्राच्या बाहेर व आत या दलालांची चांगली पंगत बसून असल्याने चित्र येथे पहावयास मिळाले.
याची माहिती जिल्हा प्रशासनाला याची कल्पना आहे. यात दलालांकडून होत असलेल्या कामांत कुठलीही त्रुटी न काढता प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करणारे अधिकारी जिल्हा प्रशासनाचेच असल्याने त्यांच्याकडून यावर कारवाई होत नसल्याचे दिसते आहे. मध्यंतरी यावर आळा बसविण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. मात्र अद्यापही त्या कॅमेऱ्याने हे टिपू नये, याचेच आश्चर्य आहे. या कॅमेऱ्यासमक्ष बसून हे दलाल काम करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातील फुटेज पाहिल्यास याची कल्पना येईल. कदाचित त्यांच्याकडून ते पाहिल्याही जात असेल, असे असताना त्यांच्याकडून या दलालांवर कारवाई का होत नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. तरीही कारवाईचा पत्ता नाही. यामुळे दलालांकडून विद्यार्थ्यांची होत असलेली ही आर्थिक लुट सत्र संपेपर्यंत अशीच सुरू राहणार, हे नक्की. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून आहे.