भंगार बसेसने प्रवासी हैराण
By Admin | Updated: March 3, 2016 02:14 IST2016-03-03T02:14:58+5:302016-03-03T02:14:58+5:30
प्रवाश्यांच्या सोयीसाठी असे ब्रीद असलेल्या एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाश्यांची प्रचंड गैरसोय होत आहे.

भंगार बसेसने प्रवासी हैराण
अपघातही वाढले : ‘प्रवाश्यांच्या सेवेसाठी’मध्येच प्रवाश्यांची गैरसोय
अनिल रिठे तळेगाव(श्या.पंत)
प्रवाश्यांच्या सोयीसाठी असे ब्रीद असलेल्या एस टी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाश्यांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसभाडे वाढूनही त्या तुलनेत ग्राहकांना सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळे शक्य होईल तेव्हा नागरिक खासगी वाहनांनी प्रवास करतात. जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या तळेगाव आगारातही प्रवाश्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी खासगी वाहतूक वाढली आहे.
वर्धा जिल्ह्यात कमी बसेस असूनही उत्पादनाच्या बाबतीत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर तळेगाव आगार आहे. येथून दररोज आगाराच्या २४ बसेस धावतात. २४ बसेसमध्ये केवळ १० बसेस काहीश्या सुस्थितीत आहेत. गतवर्षी केवळ एक नवीन बस देण्यात आली. उर्वरित तेरा बसेस भंगार व्यवस्थेत रोडवर धावत आहे. सोबतच इतरही आगाराच्या ३०० ते ४०० बसेस तळेगाव आगाराच्या बसस्थानकावर येतात. यातील लांबपल्ल्याच्या सुपर बसेस सोडल्या तर गावखेड्यात जाणाऱ्या बाकी बसेसची व्यवस्था भंगार झाली आहे. अनेक बसेसला खिडक्याच नाही. कही बसमधील आसने तुटली आहेत. सीट फाटल्या आहेत.
बसेसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना खासगी गाड्यांच्या तुलनेत दीडपट जास्त प्रवासभाडे द्यावे लागते. तसेच खासगी बसमध्ये मुलांचे तिकीटही घेतले जात नाही. बऱ्याचदा वाहक उरलेले पैसेही सुटे नसल्याच्या सबबीखाली तिकीटच्या मागे लिहून मोकळे होतात. स्थानक आल्यावरही सुटे नाही असे म्हणत एक, दोन रुपये दिले जात नसल्याचे प्रवासी नेहमीच सांगतात.
तळेगाव येथून वर्धाला जायचे असल्यास महामंडळाच्या भंगार एसटीसाठी एकाला ७६ रूपये, तळेगाव ते वरूड ५२ रूपये, तळेगाव ते मोर्शी ५० रूपये, तळेगाव ते पुलगाव ६३ रूपये मोजावे लागतात. प्रवाशांनी १०० रूपयांची नोट दिल्यावर वाहक अनेकदा सुटे नसल्याचे कारण तिकिटाच्या मागे लिहून देतात. प्रवाशांना उतरताना आठवण राहिली तर बरे, अन्यथा ते पैसे सरळ सरळ वाहकाच्या घशात जातात. त्यातही प्रवाश्यांना स्थानकावर उतरताना उरलेले पैसे मागितल्यास सुटे नाही असेही सांगत सरळ बस दामटविली जाते. तसेच महामंडळाच्या पुणे, नाशिक, शिर्डी येथून सकाळी ९ नंतर येणाऱ्या निमआराम (हिरकणी) बसेस रातराणीचा चार्ज घेतात.
तळेगाव ते नागपूर लालबस सुपर-साठी १०७ रूपये तर निमआराम साठी १३७ रूपये मोजावे लागतात. शिवाय ५ ते १० वर्षापर्यंतच्या बालकाचे अर्धे तिकीट लागते. हाच प्रवास खासगी लक्झरी त्यातही एसी स्लिपरकोच बसने केल्यास केवळ १०० रूपये भाडे आकारले जाते. महामंडळाचे प्रवास भाडे खासगी बसच्या तुलनेत जास्त आहे. एवढे करूनही प्रवाशांना फाटलेल्या सीट्स, तुटलेच्या काचा असलेल्या बसेसमध्ये प्रवास करावा लागतो. याकडे महामंडळाबरोबरच प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याने त्याचा त्रास प्रवाशांना नाहकरित्या सहन करावा लागत आहे. त्यामुळे महामंडळाने प्रवाश्यांसाठी चांगल्या व सुव्यवस्थित गाड्यांची त्वरीत व्यवस्था करून द्यावी. अशी मागणी ग्रा.पं. सदस्य सुनील मोहेकर, चंद्रशेखर दुर्गे, मंगेश ठाकरे, रवींद्र कोहळे आदींसह नियमित प्रवासी करीत आहे.
खासगी वाहतुकीत वाढ
तळेगाव ते नागपूर लालबस सुपरसाठी १०७ रूपये तर निमआरामसाठी १३७ रूपये मोजावे लागतात. शिवाय ५ ते १० वर्षापर्यंतच्या बालकाचे अर्धे तिकीट लागते. हाच प्रवास खासगी लक्झरी त्यातही एसी स्लिपर कोच बसने केल्यास केवळ १०० रूपये भाडे आकारले जाते. महामंडळाचे प्रवास भाडे खासगी बसच्या तुलनेत जास्त आहे. त्यातही प्रवाशांना फाटलेल्या सीट्स, तुटलेल्या काचा असलेल्या बसेसमध्ये प्रवास करावा लागतो. त्यामुळे खासगी प्रवासी वाहतुकीत वाढ होत आहे.