वर्धेतील चौघे दोन वर्षांकरिता हद्दपार
By Admin | Updated: March 2, 2016 02:30 IST2016-03-02T02:30:50+5:302016-03-02T02:30:50+5:30
शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चौघांवर दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली.

वर्धेतील चौघे दोन वर्षांकरिता हद्दपार
शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न : पोलीस अधीक्षकांनी केली कारवाई
वर्धा : शहरातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या चौघांवर दोन वर्षांकरिता जिल्ह्यातून हद्दपारीची कारवाई करण्यात आली. तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात येणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे ही कारवाई केली.
सोनू ऊर्फ प्रकाश निबांळकर (२८), अनुप अशोक निंबाळकर (२६) दोन्ही रा. हिंदनगर, रोशन बब्बु दुबे (३५), गौरव ऊर्फ गुड्डू दुबे (२६) दोन्ही रा. सिंदी (मेघे) या चौघांचे हद्दपारीचे आदेश निर्गमित केले आहे. तर गुड्डु ऊर्फ हृषीकेश धीरज लोखंडे (१८) रा. गोंड प्लॉट हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याने त्याच्याकडून बंधपत्र लिहून घेण्यात येणार आहे. तो घरी नसल्याने बंधपत्र लिहून कारवाई अद्याप बाकी आहे.
कारवाई करण्यात आलेल्या पाचही जणांवर वर्धा शहर पोलीस ठाण्यात टोळीने जबरी चोरी, शस्त्र जवळ बाळगणे, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, शस्त्र बाळगुन दहशत पसरविण्यासाठी मारपीट करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे तसेच अवैध दारू विक्री करणे व बाळगणे आदी प्रकारातील गुन्हे दाखल आहेत. या पाच जणांच्या टोळीचा म्होरक्या सोनू उर्फ प्रकाश निंबाळकर हा असून त्याच्या नेतृत्वात गुन्हेगारी कारवाया होत असल्याचे समोर आले. या गुन्हेगारी टोळीचा बिमोड करण्याकरिता त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कार्यवाही करून हद्दपार करण्याचा प्रस्ताव शहर ठाण्यााचे पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. हद्दपारीचे प्रकरण हे पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्फतीने चालवून २६ फेब्रुवारी रोजी आदेश पारीत केला. सदर आदेशाच्या अंमलबजावणीकरिता शहर पोलिसांकडून या चारही जणांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात येणार आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम.डी. चाटे, शहर ठाण्याचे निरीक्षक एम.पी. बुराडे यांनी केली.(प्रतिनिधी)