वणा नदीचे पाणी देण्यास सर्वांचाच विरोध
By Admin | Updated: May 1, 2015 23:57 IST2015-05-01T23:57:55+5:302015-05-01T23:57:55+5:30
उत्तम गॅल्वा मेटॅलिक लिमिटेडला पाईपलाईनद्वारे भूगावला पाणी देण्यास स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असला तरी शासन प्रशासन मात्र मूग गिळून आहेत.

वणा नदीचे पाणी देण्यास सर्वांचाच विरोध
पाणी पेटले : उत्तम गॅल्वा कंपनीने पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला दिली गती
हिंगणघाट : उत्तम गॅल्वा मेटॅलिक लिमिटेडला पाईपलाईनद्वारे भूगावला पाणी देण्यास स्थानिक जनतेचा तीव्र विरोध असला तरी शासन प्रशासन मात्र मूग गिळून आहेत. याउलट उत्तम गॅल्वा ने पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कार्याला गती दिली असल्याने वणेचे पाणी पेटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
येथील वणा नदीतून भूगावच्या उत्तम गॅल्वा कंपनीला ८.७६ दलघमी पाणी उचलण्याची परवानगी २०१० मध्ये देण्यात आली. त्यावेळेस कोणत्याही हरकती न मागता पूर्व शासनाने सरळसरळ संमती देवून हा प्रश्न जनतेपासून अंधारात ठेवल्याचा आरोप केला जात असून वणेचे पाणी कंपनीला देण्यास सर्वत्र विरोध केला जात आहे.
राज्य शासनाने ती परवानगी रद्द करावी. अशीच मागणी नगर सिधार समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाच्या प्रती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासन, मंत्रालय यांनाही देण्यात आल्या आहेत.(शहर प्रतिनिधी)
जुना निर्णय रद्द करण्याची तालुकावासियांची मागणी
महात्मा फुले समता परिषद
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली पाण्याची पाईपलाईन टाकण्याची परवानगी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी समता परिषदेच्या वतीने करण्यात आली.
नगर विकास सुधार समिती
नदीचे वाहते पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी आणि गुराढोरांसाठी संरक्षित करण्याची मागणी केली. नगर विकास सुधार समितीच्या वतीने करण्यात आली.
जनसुनावणी न घेतात दिली परवानगी
जनतेला विश्वासात न घेता करार करून शासनाने परवानगी देवून जनतेशी विश्वासघात केला. याबाबतची जनसुनावणी न करता ही परवानगी दिली गेली. नियमबाह्य पद्धतीने परवानगी दिली असल्याने ती परवानगी रद्द करावी अशी मागाणी आम आदमी पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी, विविध पक्षाच्या प्रमुखांनी याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार मोहीम छेडली आहे. त्यामुळे दिलेली परवानगी रद्द करावी आणि सध्या कंपनीने पाईप लाईन टाकण्याचे सुरू केलेले कार्य थांबवावे, अशी ही मागणी होत आहे.
हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा कमी पडल्यास न. प. लाखो रूपये खर्च करून पाटबंधारे विभागामार्फत पाणी विकत घेते. परिसरातील शेतीला व शहराला पाण्याची जास्त गरज आहे. त्यामुळे वणा नदीतून भूगावच्या कंपनीला पाणी पुरवण्याची परवानगी देवू नये
राजू तिमांडे, माजी आमदार, हिंगणघाट
जनतेच्या दृष्टीने तो निर्णय अन्यायकारक असून मागील शासनाने हा निर्णय घेतलेला होता. यावर फेरविचार करून जुना निर्णय रद्द करावा. न.प.चा अध्यक्ष म्हणून माझा पाणी देण्यास पूर्ण विरोध आहे. पाण्याची सदर परवानगी लवकरात लवकर रद्द करावी,
पंढरीनाथ कापसे, नगराध्यक्ष, नगरपालिका हिंगणघाट
वणा नदी या भागासाठी जीवनदायिनी असून तालुक्यातील नागरिकांना ती पिण्याचे पाणी उपलब्ध करून देते. नदी किनाऱ्यावरील अनेक गावांचा पाणी पुरवठा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाची गरज नदी पूर्ण करते. रोजगार निर्मिती करण्यासाठी स्थानिक उद्योगाची गरज असून त्यासाठी पाणी आवश्यक आहे. उन्हाळ्यात नदीला फार कमी पाणी असते. नेमकी त्याच वेळेस पाण्याची मागणी वाढते. येथेच पाणी उन्हाळ्यात अपुरे पडत असल्याने येथून पाणी आम्ही कंपनीला जावू देणार नाही. याप्रकरणीचौकशी सुरू असून ही परवानगी फार पूर्वी तत्कालीन महाराष्ट्र शासनाने दिली असून ती रद्द करावी.
आ. समीर कुणावार, हिंगणघाट