सायंकाळच्या गाड्या रात्री उशीरापर्यंत स्क्रिनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:47 IST2017-09-06T00:47:08+5:302017-09-06T00:47:30+5:30

रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मोबाईल, संगणकावर गाड्यांचे वेळापत्रक तपासून रेल्वे स्थानकावर पोहोचतात. असे असले तरी अनेक ग्रामीण प्रवाशांना ते शक्य होत नाही.

Evening trains till late in the night on the screen | सायंकाळच्या गाड्या रात्री उशीरापर्यंत स्क्रिनवर

सायंकाळच्या गाड्या रात्री उशीरापर्यंत स्क्रिनवर

ठळक मुद्देवर्धा रेल्वे स्थानकावरील प्रकार : प्रवाशांमध्ये संभ्रम, अनाऊन्समेंटही चुकीची

प्रशांत हेलोंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी मोबाईल, संगणकावर गाड्यांचे वेळापत्रक तपासून रेल्वे स्थानकावर पोहोचतात. असे असले तरी अनेक ग्रामीण प्रवाशांना ते शक्य होत नाही. ते थेट रेल्वे स्थानकावर येतात; पण वर्धा रेल्वे स्टेशनवर सायंकाळी गेलेल्या गाड्यांची ‘पोझीशन’ही रात्री उशीरापर्यंत ‘स्क्रिन’वर झळकत असल्याने संभ्रम निर्माण होतो. शिवाय ‘अनाऊंसमेंट’ही चुकीचे केले जात असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. मुंबई येथे मंगळवारी पुन्हा अपघातस्थळावर रुळाखालची माती सरकली. या पार्श्वभूमीवर गाड्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी लोकमत प्रतिनिधींनी स्टेशनवर फेरफटका मारल्यावर ही परिस्थिती लक्षात आली.
नागपूर-सीएसटी दुरंतो एक्स्प्रेसला अपघात झाला. या अपघातामुळे प्रवासी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. यामुळे रेल्वे स्थानकावर कोणती गाडी किती वाजता येणार आहे वा गेली, हे दर्शविणे गरजेचे असते; पण वर्धा रेल्वे स्थानकावर अनेकदा गाड्या वर्धा रेल्वे स्थानकावरून पास झालेल्या असताना रात्री ११ वाजेपर्यंत त्या मुख्य स्क्रिनवर दाखविल्या जातात. सायंकाळी ६.२४ वाजता वर्धा रेल्वे स्थानकावरून सुटणारी नागपूर-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस रात्री ११ वाजता प्रवाशांना स्क्रिनवर दिसली तर ते चक्रावतात. मागील काही दिवसांपासून वर्धा रेल्वे स्थानकावर हाच प्रकार पाहावयास मिळत आहे. सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या दरम्यान सुटणाºया रेल्वे गाड्या रात्री १० ते ११ वाजेपर्यंत स्क्रिनवर दाखविल्या जातात. या प्रकारामुळे रेल्वेगाड्या इतक्या उशिरा धावत आहेत काय, असा प्रश्न प्रवाशांना पडल्याशिवाय राहत नाही. वर्धा रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेत ‘स्क्रिन’वरील ‘डिस्प्ले’कडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. या साºया गोंधळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल आहे.
सेवाग्राम एक्स्प्रेसची सूचनाच नसते
नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस रात्री १० वाजून १० मिनीटांनी वर्धा रेल्वे स्थानकावर येते. २० मिनीट बल्लारशहा येथून पॅसेंजरने जोडून येणाºया आरक्षित डब्यांना जोडण्यासाठी देण्यात आले आहे. गाडी २० मिनीट थांबत असल्याने प्रवासी निश्चिंत फलाटावर बसलेले असतात. ही गाडी १०.३० वाजता रेल्वे स्थानकावरून सुटणे अपेक्षित असते; पण ती कधीही वेळेवर सोडली जात नाही. १०.१० ला आलेली गाडी दररोज रात्री १०.४५ ते ११ वाजताच्या सुमारास सोडली जाते. ही गाडी सोडत असताना कुठल्याही प्रकारचे अनाऊंसमेंट केले जात नाही. परिणामी, फलाटावर निश्चिंत बसलेल्या प्रवाशांची धावपळ होते. अनेकदा अचानक गाडी सुरू होत असल्याने अनेकांना गाडी सोडून द्यावी लागते. या प्रकाराला आळा घालण्याची जबाबदारी असलेले वर्धा रेल्वे प्रशासन मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.
 

Web Title: Evening trains till late in the night on the screen