कारवाईनंतरही प्लास्टिकचा विळखा कायमच
By Admin | Updated: January 11, 2015 23:02 IST2015-01-11T23:02:01+5:302015-01-11T23:02:01+5:30
न्यायालयाच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक थैल्या वापरण्यावर बंदी आणली आहे. या थैल्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहे.

कारवाईनंतरही प्लास्टिकचा विळखा कायमच
पालिकेचे धाडसत्र सुरूच : जनजागृतीकरिता पत्रक वाटपाची तयारी
वर्धा : न्यायालयाच्यावतीने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक थैल्या वापरण्यावर बंदी आणली आहे. या थैल्या वापरणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहे. यानुसार पालिकेच्यावतीने कारवाई सुरू आहे; मात्र शहरात या प्लास्टिक थैल्याचा वापर जोरात सुरू असल्याचे चित्र आहे. रस्त्यारस्त्यावरील कचऱ्याच्या ढिगात प्लास्टिकच्या थैल्या दिसत असल्याने शहराला प्लास्टिकचा विळखा कायमच आहे.
पर्यापरणाच्या दृष्टीने घातक असलेल्या या प्लास्टिक थैल्यांच्या वापरावर न्यायालयाच्यावतीने बंदी आणण्यात आली. ५० मायक्रॉनच्या प्लास्टिक थैल्या नाल्यात वा पाणी वाहून नेणाऱ्या ठिकाणी अडकत असल्याने पाणी रस्त्यावर साचत आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. यात न्यायालयाच्या निर्णयावरून शासनाच्यावतीने काढण्यात आलेल्या आदेशान्वये पालिकेच्यावतीने कारवाई सुरू आहे; मात्र नागरिकांकडून याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने नियम धाब्यावर बसवून नियमात नसलेल्या प्लास्टिक थैल्यांचा वापर सुरूच आहे.
पालिकेच्यावतीने शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्या जप्त करण्याची मोहीम सुरू केली. यात व्यावसायिकाला दंडही ठोठावण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास ७०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर ५० च्यावर दुकानमालकांकडून ६० हजार रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला आहे. पालिकेडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत प्लास्टिक थैल्या जप्त करण्यासह दंड आकारण्यात येत असला तरी या प्लास्टिकच्या थैल्यांचा खच शहरातील कचऱ्यात दिसत आहे.
शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना प्लास्टिकच्या थैल्यांमुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात नागरिकांनी बाजारात येताना कापडी पिशवी आणली तरी या थैल्यांचा वापर कमी होईल असे पालिकेचे म्हणणे आहे. शहरातील पान टपऱ्यांवरील पन्न्यांमुळे यात भर पडत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)