पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवड आवश्यक
By Admin | Updated: February 6, 2016 02:18 IST2016-02-06T02:18:54+5:302016-02-06T02:18:54+5:30
पर्यावरणावर दिवसेंदिवस ताण वाढल्याने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.

पर्यावरणाच्या समतोलासाठी वृक्ष लागवड आवश्यक
मोहन गुजरकर : पर्यावरणाच्या जाणीव जागृतीसाठी सामाजिक वनीकरण विभागाचा पुढाकार
वर्धा : पर्यावरणावर दिवसेंदिवस ताण वाढल्याने पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड करणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. पर्यावरण संरक्षणासाठी छोट्या, छोट्या उपायांनीच मोठी मदत होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा समादेशक प्रा. मोहन गुजरकर यांनी केले.
जिल्हास्तरीय वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धां घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या पुरस्कार विरतण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन व जलसंवर्धनाविषयीचे जाणीव जागृती व्हावी, सामाजिक वनीकरण विभागाच्या वृक्ष लागवड, पडीत जमीन विकास, जल संवर्धन कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग वाढावा या उद्देशाने जिल्हास्तरीय निबंध, चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवासी येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात आला.
दोन गटात निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. माध्यमिक गटासाठी ‘स्वच्छता अभियानात माझी भूमिका’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागतिक तापमान वाढ व हवामानातील बदल’, हे विषय होते. तीन गटात विभाजित चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटासाठी ‘मी पाहिलेला जंगलातील प्राणी’, व माध्यमिक गटासाठी ‘माझी हरित शाळा’ तर महाविद्यालयीन गटासाठी ‘बदललेल्या ऋतुचक्राचे परिणाम’ विषय होते. वक्तृत्व स्पर्धेकरिता माध्यमिक गटांना ‘पर्यावरणस्रेही जीवनशैली’ आणि महाविद्यालयीन गटासाठी ‘जल प्रदूषणाची समस्या व त्यावरील उपाय’ विषय देण्यात आले होते. निबंध व चित्रकला स्पर्धा शाळा, महाविद्यालयीन पातळीवर घेण्यात आली. वक्तृत्व स्पर्धा प्रथम तालुकापातळीवर व नंतर जिल्हापातळीवर घेण्यात आली. निबंध लेखनाचे परीक्षण सुरेखा दुबे, रितेश निमसडे, चित्रकला स्पर्धेचे परीक्षण सुनील रहाटे, वैशाली सावंत, राजेंद्र लांजेवार तर वक्तृत्व स्पधचे परीक्षक डॉ. प्रवीण वानखेडे व डॉ. सुनिता भोईकर, सुषमा पाखरे यांनी केले.
प्रास्ताविक पी. एच. बडगे यांनी केले. आभार बी. डी. खडतकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी के. वाय. तळवेकर, व्ही. डी. गभणे, शीतल राठोड, बी.जी. राठोड, बी. बी. फटांगरे, शीला कांबळे, ए.आर. कावळे, ए. बी. वंजारी, मधुकर गायकवाड, रूपचंद चोपडे आदींनी पुढकार घेतला.(शहर प्रतिनिधी)