‘हॉटस्पॉट’मधून कर्मचाऱ्यांचे ‘सिमोल्लंघन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST2020-04-21T05:00:00+5:302020-04-21T05:01:02+5:30
कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी नाक्यावर कसून चौकशी होत असून कुण्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ये-जा करण्यासाठी परवानगी दिलेली नाही, असे प्रशासनाकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नसला तरी लगतच्या नागपूर, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण असल्याने येथून अप-डाऊन करणाºयांपासून वर्ध्यालाही धोका होण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात लोेकमतला तक्रारी प्राप्त झाल्या.

‘हॉटस्पॉट’मधून कर्मचाऱ्यांचे ‘सिमोल्लंघन’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाबाधित जिल्ह्यातून येणाऱ्यांची तपासणी नाक्यावर कसून चौकशी होत असून कुण्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला ये-जा करण्यासाठी परवानगी दिलेली नाही, असे प्रशासनाकडून छातीठोकपणे सांगितले जात आहे. वर्धा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आला नसला तरी लगतच्या नागपूर, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण असल्याने येथून अप-डाऊन करणाºयांपासून वर्ध्यालाही धोका होण्याची शक्यता असल्याने यासंदर्भात लोेकमतला तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार वृत्त प्रकाशित केल्यानंतरही ये-जा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फारसा परिणाम पडला नाही. याबद्दल एकही तक्रार नसल्याचे सांगून जिल्हा प्रशासनाकडून हात वर केले जात आहे. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लोकमत चमूने सोमवारी सकाळी ७ ते ९ वाजतापर्यंत जिल्ह्याच्या सीमेवरील तीन तपासणी नाक्यांवर ‘स्टिंग ऑपरेशन’ केले. यादरम्यान स्वत:चे, परिवाराचे आणि जिल्ह्याचे आरोग्य धोक्यात घालून शंभरावर शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सिमोल्लंघन केल्याचे वास्तव पुढे आले.
या तीन तपासणी नाक्यांवर पोहोचला ‘लोकमत’
1. सेलडोह तपासणी नाका...
वर्धा ते नागपूर महामार्गावरील सेलडोह येथे जिल्हा सीमेवर तपासणी नाका आहे. या मार्गाने नागपूर जिल्ह्यातून येणाºया अधिकारी व कर्मचाºयांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे तब्बल दोन तास या ठिकाणी लोकमतच्या प्रतिनिधींनी पहारा दिला. कार्यालयाची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतसा अधिकारी व कर्मचाºयांचा ओघही वाढत होता. जवळपास ५० ते ६० अधिकारी व कर्मचारी या तपासणी नाक्यावरून वर्ध्यात दाखल झाले. जे अधिकारी आता वर्ध्यातच राहणार असल्याचे सांगत होते, त्यांना वर्ध्याकडे पाठविण्यात आले. तर जे अप-डाऊन करण्याच्या तयारीत होते, त्यांना पोलिसांनी परतविले. काही अधिकारी चारचाकी तर काही दुचाकीने प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले. तपासणी नाक्यावर सर्व वाहनांचे निर्जंतुकीकरण करून आलेल्यांची नोंद घेतल्यानंतर त्यांना पुढील प्रवासाकरिता पाठविले. यामध्ये खासगी डॉक्टर, बॅक, महावितरण, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, जलसंपदा विभाग, डाक विभाग, रेल्वे प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, नगर परिषद, पोलीस प्रशासन, कृषी विभाग यातील अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग होता.
2. पुलगाव तपासणी नाका...
वर्धा ते अमरावती मार्गावरील जिल्हा सीमेवर असलेल्या पुलगाव येथील तपासणी नाक्यावर सकाळी साडेसहा वाजता आमचे प्रतिनिधी पोहोचताच चांगलीच खळबळ उडाली. येथील वर्धा नदीच्या पुलावरून अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी अमरावती जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याचे दिसून आले. तर वर्ध्यातील काही अधिकारी व कर्मचारी अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात जात असल्याचेही निदर्शनास आले. दोन ते अडीच तासांच्या कालावधीत चाळीसवर अधिकारी व कर्मचारी अप-डाऊन करताना आढळून आले. यामध्ये शिक्षक, समृद्धी महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी आणि वर्ध्यातील रहिवासी असलेले वाशीम जिल्हा परिषदेचे दोन अधिकारी अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत गेले. तसेच देवळीतील स्टेट बँक आॅफ इंडिया, वर्ध्यातील पंजाब नॅशनल बँक, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय वर्धा, बियाणे महामंडळ वर्धा, महावितरण विभाग वर्धा व पुलगाव, कृषी विभाग समुद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालय, महसूल विभाग येथे कार्यरत अधिकारी व कर्मचारी अमरावती जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. काहींनी तर कर्तव्यावर न जाता घरचा रस्ता धरण्यातच धन्यता मानली.
3. खडका तपासणी नाका...
आष्टी तालुक्यातील अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील खडका येथील तपासणी नाक्यावरही अशीच परिस्थिती पाहायला मिळाली. अमरावती जिल्ह्यातून अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात येतात. त्यामुळे याही ठिकाणी वॉच ठेवल्यानंतर जवळपास १५ ते २० कर्मचारी अमरावती जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात दाखल झाले. तपासणी नाक्यावरील पोलिसांनी सर्वांची तपासणी करीत त्यांची नोंद घेतली. यामध्ये ग्रामीण रुग्णालय कारंजा (घा.), स्टेट बँक शाखा सारवाडी, अॅलोपॅथी दवाखाना भारसवाडा, महावितरण विभाग कारंजा (घा.), न्यायालयीन कर्मचारी, कारंजा (घा.), मंडी उपस्वास्थ्य केंद्र, तळेगाव (श्या.पंत.), नगरपरिषद आर्वी, पंचायत समिती कारंजा (घा.), सहाय्यक निबंधक, नागपूर येथील अधिकारी व कर्मचाºयांचा सहभाग आहे. अमरावती-नागपूर या दोन्ही जिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके असताना दोन्ही जिल्ह्यांतून शासकीय कर्मचारी नेहमीच वर्धा जिल्ह्यात ये-जा करतात. तसेच अमरावती व नागपूर जिल्ह्यात नोकरी करणारे अनेक जणही आर्वी, आष्टी व कारंजा परिसरातून कोरोनाबाधित जिल्ह्यात आवागमन करीत आहे, ही संशोधनाची बाब आहे.