विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागाच अधिक

By Admin | Updated: June 19, 2016 01:47 IST2016-06-19T01:47:51+5:302016-06-19T01:47:51+5:30

दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे.

Eleventh position is more than the students | विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागाच अधिक

विद्यार्थ्यांपेक्षा अकरावीच्या जागाच अधिक

विद्यार्थी १५ हजार ८३० : जागा २० हजार ८००, कॉलेजचीच धावाधाव
श्रेया केने  वर्धा
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांसह पालकांना वेध लागतात ते प्रवेश मिळविण्याचे. अकरावीतील प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालयापुढे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र याची गरज भासणार नाही. जिल्ह्यात १५ हजार ८३० विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असून अकरावीकरिता २० हजार ८०० जागा आहेत. त्यामुळे ५ हजार जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांकरिता कॉलेजचीच धावाधाव होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात १३० कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या असून २०८ तुकड्या आहेत. ज्या महाविद्यालयात पदवीच्या शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात १०० तर ज्या महाविद्यालयात केवळ बाराव्या वर्गापर्यत शिक्षणाची सुविधा आहे त्या महाविद्यालयात ६० प्रवेशाची मुभा आहे. यात प्रत्येक महाविद्यालय शिक्षण उपसंचालकांकडून २० जागा या वाढीव मागत असतात, यामुळे जिल्ह्याची प्रवेश क्षमता २० हजार ८०० पर्यंत आाहे. यातही नामांकित महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांसह पालकही प्रयत्नरत असतात. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला असून याचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. यातून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीनंतर गुणवत्ता यादी जाहीर करून त्यानुसार प्रवेश दिल्या जातो.
प्रवेशाकरिता महाविद्यालयांपुढे पालक व विद्यार्थ्यांच्या रांगा पाहायला मिळतात. दरवर्षी अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. यंदा मात्र हे चित्र पालटण्याचे चिन्ह आहे. परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कनिष्ठ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता अधिक आहे. त्यामुळे पाच हजार जागा रिक्त राहणार असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. या रिक्त जागा भरण्याकरिता महाविद्यालयांचीच आता धावाधाव होणार असल्याची चिन्हे जिल्ह्यात दिसत आहेत.

शाखानिहाय प्रवेश क्षमता
कला, वाणिज्य, विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम अशा चार शाखांमिळून असलेल्या १३० महाविद्यालयात २० हजार ८०० विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. यात अनुदानित व विनाअनुदानित अशा २०८ तुकड्या आहेत. कला शाखेत ९४ तुकड्या अनुदानित तर २० विना अनुदानित आहे. विज्ञान शाखेत २० अनुदानित तर ३८ विनाअनुदानित आहे. वाणिज्य शाखेत २० अनुदानित आणि १६ विना अनुदानित आहेत. अनुदानित आणि विना अनुदानित तुकड्यांची प्रवेश क्षमता पाहता २० हजार विद्याथी यात प्रवेशित होऊ शकतात; मात्र दहावी परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी संख्या १५ हजार ८०० आहेत.
तंत्रनिकेतन, आयटीआयच्या जागा वेगळ्याच
या उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी तंत्रनिकेतन, आयटीआय येथे प्रवेश घेतात. तसेच काही विद्यार्थी जिल्ह्याबाहेर शिक्षण घेण्यासाठी जातात. त्यामुळे ५ हजाराहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Eleventh position is more than the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.