१५ दिवसांपासून वीज, पाणी बंद
By Admin | Updated: July 9, 2015 02:11 IST2015-07-09T02:11:34+5:302015-07-09T02:11:34+5:30
नजीकच्या वाघोली येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी संपुष्टात आली.

१५ दिवसांपासून वीज, पाणी बंद
वाघोलीच्या ग्रामस्थांची व्यथा : सार्वजनिक विहिरीत गाळच गाळ, पाणी आटले
आष्टी (शहीद) : नजीकच्या वाघोली येथील सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याची पातळी संपुष्टात आली. विद्युत वितरण कंपनीने तुटलेल्या तारा दुरूस्त केल्या नाही. यामुळे विजेअभावी गावात काळोख पसरला आहे. गत १५ दिवसांपासून ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवक व वीज कंपनीचा निषेध नोंदविला. ग्रामस्थांनी रिक्त भांडे दाखवून निषेध नोंदविल्याने प्रशासनात खळबळ माजली.
पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात मुबलक पाणीसाठा आहे. ग्रा.पं. च्या सार्वजनिक विहिरीत गाळ साचल्याने पाण्याचे झरे बंद झाले. या विहिरीवरून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा होतो. गाळ काढण्यासाठी ग्रामसेवकाला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले. यामुळे पाणीपुरवठा बंद झाला. या विहिरीवर जोडण्यात आलेला वीज पुरवठा बंद झाल्याची माहिती वीज कंपनीचे अंतोरा कार्यालयाचे अभियंता एम.एम. पेठे यांना दिली; पण पेठे यांनी दुरूस्त करण्याचे आश्वासन देऊन १४ दिवसांपासून वीज सुरू केली नाही. ग्रामस्थांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. आजपर्यंत वाघोली गावात अशा समस्या उद्भवल्या नाही; पण ग्रामसेवक पठाण यांच्या ढीसाळ कारभारामुळे ही स्थिती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याविरूद्ध देवानंद डमके, ज्ञानेश्वर गवळी, प्रवीण अलोणे, पंकज लव्हाळे, अभिजीत खैरकार, रमेश ढवळे, श्रीधर वानखडे, सुरज लव्हाळे, प्रीतम सरोदे यांनी आरोग्यसेविका शारदा शिरसाट यांना गावात बोलवून पाण्याचे नमुने घेण्यास सांगितले. यात गाळ असल्यानेच दूषित पाणी असल्याचा अहवाल त्यांनी दिला. पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांनी हातपंपावरून पाणी भरणे सुरू केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)
संतप्त ग्रामस्थांकडून निषेध; ग्रामसेवकावर कारवाईची मागणी
गत १५ दिवसांपासून वीज आणि पाणी पुरवठा बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी रिक्त भांडे घेऊन निषेध नोंदविला. यावेळी दोषी ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी लावून धरली. वीज व पाणी नसल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
वाघोली ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत कर्मचारी केशव राऊत यांच्याकडे तक्रार केली असता तेही सतत दुर्लक्ष करीत आहेत. या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनातून दिला. यावर पंचायत समिती प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उन्हाळ्यात गाळ काढला नाही
विहिरीमध्ये गाळ असल्याची माहिती ग्रा.प. सदस्यांनी सचिव पठाण यांना दिली होती. असे असताना गाळ काढण्यासाठी सुरूवात केली नाही. सरपंचांनी ग्रामसेवक पठाण यांची बदली करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक नितीन साव यांची आॅर्डर काढली; पण ग्रामसेवक पठाण यांनी अद्याप पदभार दिला नाही. यामुळे कामकाज चालविणे कठीण झाले आहे.
हातपंपालाही अपुरे पाणी
सार्वजनिक विहिरीमधील झरे बुजले व पाणी आटल्याने पाणी पुरवठा बंद झाला. यामुळे ग्रामस्थांनी हातपंपावरून पाणी भरणे सुरू केले; पण हातपंपालाही पुरेसे पाणी नसल्याने गोची झाली आहे. शिवाय गर्दी होत असल्याने महिलाही त्रस्त आहेत.
ग्रामसेवक पठाण काम करीत नाही. यामुळे दुसरे ग्रामसेवक देण्याची मागणी सरपंचांनी केली होती. १ जुलै रोजी ग्रामसेवक नितीन साव यांची आॅर्डर काढली आहे. पाणी पुरवठा बंद असल्याबाबत चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल.
- अनिल गावंडे, गटविकास अधिकारी, पं.स. आष्टी (श.).
विजेच्या तारा तुटलेल्याच
वादळ व पावसामुळे विजेच्या तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामसेवकाने वीज कंपनीकडे तक्रार केली नाही. अखेर ग्रामस्थांनी तक्रार केली. यावर वीज कंपनीचे अभियंता पेठे यांनी दुरूस्तीचे आश्वासन दिले होते; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आलेली नाही. ग्रामस्थ चकरा मारतात; पण वीज कंपनीचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने तेही हतबल झाले आहे.