वेतनास विलंब होत असल्याने पोलीस प्रशासनात रोष
By Admin | Updated: May 15, 2014 01:44 IST2014-05-15T01:44:45+5:302014-05-15T01:44:45+5:30
दर महिन्याचे वेतन बरोबर तारखेलाच खात्यात जमा व्हआवे अशी कर्मचारी वर्गाची अपेक्षा असते. शासकीय कर्मचारी तर तशी अपेक्षा करीतच असतात.

वेतनास विलंब होत असल्याने पोलीस प्रशासनात रोष
आर्थिक बजेट डळमळीत: पोलीस अधीक्षकांनी लक्ष पुरविण्याची मागणी
वर्धा : दर महिन्याचे वेतन बरोबर तारखेलाच खात्यात जमा व्हआवे अशी कर्मचारी वर्गाची अपेक्षा असते. शासकीय कर्मचारी तर तशी अपेक्षा करीतच असतात. परंतु पोलीस कर्मचारी वर्गाचे महिन्याचे वेतन अर्धाअधिक महिना निघून गेल्यानंतर बचत खात्यात जमा होत असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनात कार्यरत अधिकारी व कर्मचारी वर्गात रोष निर्माण झाला आहे. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनात ११00 कर्मचारी व २00 अधिकारी कार्यरत आहेत. त्यांचे वेतन, त्यांना देण्यात येणारे वेगवेगळे भत्ते व इतर लाभांची बिले पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा विभागातून तयार केली जातात. ही बिले जिल्हा कोषागार कार्यालयात पाठविल्यानंतर त्यास मंजुरी मिळते. त्यानुसार प्राप्त होणारा धानादेश हा स्टेट बँकेत अथवा कर्मचार्यांच्या वेतनाच्या बचत खाते असलेल्या बँकेला पाठवून धनादेश क्लिअरन्स झाल्यावर कर्मचार्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येतो. ही पद्धत सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा विभागातून सुरू असल्याचे सांगण्यात येते.
आता या विभागातील कामकाज हे संगणकीकृत झाले आहे. पूर्वी ते कागदोपत्री व्यक्तीगतरित्या केल्या जात असल्याने कर्मचारी, अधिकार्यांचे वेतन दर महिन्याच्या २८ ते ३0 तारखेदरम्यान व्हायचे. क्वचितच १ किंवा २ तारखेला वेतन होत होते, असे कर्मचारी सांगतात. आता लेखा विभागात कार्यरत असलेले कर्मचारी संगणकावर वेतन बिले तयार करीत असून गेल्या काही महिन्यांत कर्मचार्यांच्या वेतनाची रक्कम बचत खात्यात जमा होऊ लागली आहे.
मार्च महिन्याचे वेतन एप्रिलच्या १७ ते १८ तारखेला कर्मचार्यांना मिळाले. पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या काही कर्मचार्यांना २४ तारखेला हे वेतन मिळाल्याचे कळते. एप्रिल महिन्याचे वेतन वेळेवर मिळेल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण मे महिन्यांची १२ तारीख येऊनही वेतनाचा पत्ता नाही. कर्मचार्यांचे तर सोडा अधिकार्यांचेही वेतन झाले नसल्याची बाब समोर येत आहे. उशिरा होणार्या वेतनामुळे शिकवणीवर्गाची फी, ऑटोरिक्षाचा किराया, घरखर्च एलआयसीचे हप्ते, सोसायटीची थकबाकी कर्मचारी वर्गाला कधीच वेळेवर चुकती करता येत नाही. परिणामी कर्मचार्यांचे आर्थिक बजेट डळमळीत झाल्याच्या तक्रारी कर्मचार्यांकडून केल्या जात आहे.
पोलीस प्रशासन हे नियमाच्या फुटपट्टीला धरून चालते. या विभागात एक शिस्त असते. परंतु त्याच विभागात शासकीय कर्मचारी वर्गाचेच वेतन योग्य वेळी होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. ही बाब पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घ्यावी व वेतन ५ तारखेपर्यंत करण्यात यावे, अशी मागणी कर्मचार्यांकडून होत आहे.(शहर प्रतिनिधी)