शहरात पाणपक्ष्यांचा अधिवास धोक्यात
By Admin | Updated: April 24, 2015 23:54 IST2015-04-24T23:54:22+5:302015-04-24T23:54:22+5:30
शहरातील हुनमान टेकडी परिसरात असलेल्या आयटीआय टेकडी परिसरात असलेल्या तलावातील कमळपुष्प व पाणवनस्पीमुळे तो पाणपक्ष्यांच्या अधिवासाकरिता योग्य ठरला आहे.

शहरात पाणपक्ष्यांचा अधिवास धोक्यात
संबंधीत विभागाचे दुर्लक्ष : आयटीआय टेकडी परिसरातील होणारे बांधकाम अडचणीचे
वर्धा : शहरातील हुनमान टेकडी परिसरात असलेल्या आयटीआय टेकडी परिसरात असलेल्या तलावातील कमळपुष्प व पाणवनस्पीमुळे तो पाणपक्ष्यांच्या अधिवासाकरिता योग्य ठरला आहे. येथे होत असलेल्या बांधकामामुळे या तलावाचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. शिवाय या तलाव परिसरात पसरत असलेल्या अस्वच्छतेचाही या पक्षांना त्रास होत असल्याचे समोर येत आहे.
तलाव परिसरात परपल स्वॅपहेन, कॉमन मूरहेन, परपल हॅरोन, व्हाईट ब्रेस्टेड वॉटरहेन, व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर, स्मॉल ब्लू किंगफिशर, कारमोरंट, पाँड हेरोन तथा लिटील व कॅटल इग्रेटस या सारखे अनेक पाणपक्षी नियमित आढळून आले आहेत. कॉमन हुरहेन, परपल स्वॅम्पहेन व वॉटरहेनची नेस्टींग साईड असून पक्षी निरीक्षकांना पिलांसहित हे पक्षी आढळून आलेले आहेत. शिवाय सफोज वुडपिकर (उदी सुतार) हा क्वचित आढळणाऱ्या पक्ष्यांची नोंद देखील या परिसरात पक्षी मित्रांनी केली आहे.
तलाव असलेल्या परिसरात शासकीय वसतीगृहाच्या बांधकामास प्रारंभ झालेला आहे. हा भाग तलावाला लागून येतो. शिवाय ले-आऊट करीता टेकडीचे अक्षरश: सपाटीकरण करणे सुरू आहे. कुणीही यावे आणि कचरा टाकून जावे या प्रकारामुळे या परिसरात जागोजागी प्लास्टिक कचऱ्याचे ढिग दिसतात. त्यामुळे सकाळी येथे फिरण्याकरिता येणाऱ्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या सर्व प्रकाराला थांबवण्यासाठी संबंधित विभागांची कुठलीही हालचाल दिसत नाही. आता जनप्रतिनिधींच या विषयी पुढाकार घ्यावा, असी अपेक्षा पक्षी अभ्यासक करीत आहे. पाणपक्ष्यांचे महत्त्व लक्षात घेऊन हा अधिवास वाचवावा तसेच या तलावाचे खोलीकरण करून सुरक्षेसाठी कुंपन व सौंदर्यीकरण करण्यात यावे, तसेच गैरप्रकार थांबविण्यासाठी त्वरीत कार्यवाही व्हावी, अशी मागणी वर्धेतील पक्षीमित्र व पक्षी अभ्यासक दिलीप विरखडे, किशोर वानखेडे, राहुल तेलरांधे, संजय इंगळे तिगावकर, घनश्याम माहुरे, पराग दांडगे, रमेश बाकडे, दीपक गुढेकर, प्रभाकर पुसदकर, सुभाष मुढे, जयंत सबाने, रवींद्र पाटील, डॉ. बाबाजी घेवडे, कौस्तुब गावंडे, मनोहर लटारे, पार्थ वीरखडे यांच्यासह अनेकांनी केली आहे.(प्रतिनिधी)