जिल्ह्यात ९८ गावे ‘मिनीडेंजर झोन’मध्ये
By Admin | Updated: February 11, 2016 02:22 IST2016-02-11T02:22:40+5:302016-02-11T02:22:40+5:30
शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत आहे; पण जिल्ह्यातील दूषित पाणी पिच्छा सोडत नसल्याचे दिसते.

जिल्ह्यात ९८ गावे ‘मिनीडेंजर झोन’मध्ये
दूषित पाणी : ९२० गावांतील २ हजार ८७५ स्रोतांची तपासणी
गौरव देशमुख वर्धा
शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून शासनस्तरावर अनेक प्रयत्न होत आहे; पण जिल्ह्यातील दूषित पाणी पिच्छा सोडत नसल्याचे दिसते. ब्लिचिंगवर खर्च होत असतानाही जिल्ह्यातील ९८ गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ही गावे ‘मिनीडेंजर झोन’ जाहीर करण्यात आली आहेत.
जि. प. आरोग्य विभागाद्वारे स्वच्छता सर्वेक्षण मोहीम राबविली जाते. यात ५१४ ग्रा.पं. अंतर्गत ९२० गावांत २ हजार ८७५ पाण्याचे स्त्रोत तपासले गेले. यातील ९८ गावांतील स्त्रोत दूषित असल्याचे समोर आले. ९८ ग्रा.पं. मिनीडेंजर झोनमध्ये असल्याचे जाहीर झाल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. पाण्याच्या शुद्धतेकरिता ब्लिचिंग पावडरसाठी ग्रा.पं. मोठा खर्च दाखविते. असे असताना जिल्ह्यातील ९२० पैकी ९८ गावांत दूषित पाण्याचे स्त्रोत दिसून आले. यामुळे ५१४ पैकी ८० ग्रा.पं. ला पिवळे कार्ड देण्यात आले आहे. सलग पिवळे कार्ड मिळाल्यास त्यांना डेंजर झोनमध्ये टाकून लाल कार्ड दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलग दोन वर्षे लाल कार्ड मिळाल्यास त्या ग्रा.पं. चे अनुदान रोखले जाते. आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात नोंद असलेल्या पाण्याचेच स्त्रोत तपासले जातात. प्रत्येक ग्रा.पं.च्या स्त्रोताची नोंद असेल, असे नाही. यामुळे ग्रामसेवकांनीच लक्ष देणे गरजेचे आहे.
८० ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड; जल सुरक्षकांचे दुर्लक्ष
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व ग्रा.पं. प्रशासन यांना जलसुरक्षक संबोधले जाते. आपल्या गावात दूषित पाणी तर पुरविले जात नाही ना, याची काळजी, खबरदारी बाळगण्याची जबाबदारी त्यांची असते; पण या कर्मचाऱ्यांना आपल्या जबाबदारीचा विसर पडल्याचेच दिसून येते.
जोखीमयुक्त स्रोतांची गावे
जोखीमयुक्त जलस्रोत असलेल्या गावांमध्ये वर्धा तालुक्यात ६, सेलू १०, देवळी २२, आर्वी १७, आष्टी १, कारंजा २१, समुद्रपूर ६ आणि हिंगणघाट तालुक्यातील १५ गावांचा समावेश आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील ३ गावांना डेंजर झोनचे संकेत देण्यात आले. आरोग्य विभागाने त्या ग्रा.पं. ला कठोर सूचना दिल्या होत्या. यावरून त्या गावांनी त्वरित व्यवस्था करून हिरवे कार्ड प्राप्त केले.
७० टक्केपेक्षा अधिक वापरातील स्त्रोतांची तपासणी
गावातील ७० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक ज्या विहिरी व हातपंपातील पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात, त्या पाण्याचे स्त्रोत तपासले जातात. तपासात तीव्र जोखीम आढळल्यास त्या ग्रामपंचायतीला लाल कार्ड दिले जाते.
गावातील असुरक्षित पाणी पुरवण्याची जोखीम ७० टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास तीव्र जोखीम समजली जाते. ती ३० ते ६९ टक्क्यांपर्यंत असल्यास मध्यम जोखीम समजली जाते. स्त्रोताभोवती अस्वच्छता व दुर्गंधीयुक्त वातावरण असल्यास त्या गावांना पिवळे कार्ड दिले जाते.
हिरवे कार्ड हे सर्व जलस्त्रोत व्यवस्थित आढळून आल्यास दिले जाते. यासाठी गावाला पाणी पुरवठा होत असलेल्या संपूर्ण जलस्त्रोताची पाहणी केली जाते. यानंतर वर्गवारी करून कार्ड देण्याचे ठरविले जाते. सलग ५ वर्षे हिरवे कार्ड प्राप्त केलेल्या ग्रामपंचायतींना चंदेरी कार्ड दिले जाते. त्या गावांत कुठलाही साथीचा आजार पसरलेला नसणे आवश्यक असते. अशा ग्रामपंचायतींना शासनाद्वारे गौरव पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाते.