तालुक्यातील सहा मंडळस्तरावर पीककर्जाचे वाटप
By Admin | Updated: May 28, 2016 02:11 IST2016-05-28T02:11:06+5:302016-05-28T02:11:06+5:30
तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली, विजयगोपाल, भिडी अंदोरी आदी सहा मंडळ स्तरावर शुक्रवारी पीककर्ज मेळावे घेण्यात आले.

तालुक्यातील सहा मंडळस्तरावर पीककर्जाचे वाटप
बँकेच्या नियमांमुळे अनेक अडचणी : आयोजित मेळाव्यात बँक अधिकारी व कास्तकारांची उपस्थिती
देवळी : तालुक्यातील देवळी, पुलगाव, गिरोली, विजयगोपाल, भिडी अंदोरी आदी सहा मंडळ स्तरावर शुक्रवारी पीककर्ज मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यात नवीन पीककर्ज, पीककर्जाचे नूतनीकरण तसेच पीककर्जाच्या पुर्नगठनाबाबत विचारविनीमय होवून काही प्रकरणे निकाली काढण्यात आली. देवळी येथील मेळाव्यात बँक विविध बँकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आयोजित मेळाव्यात १९ मे नंतर आजपावेतो देण्यात आलेल्या पीककर्जाची माहिती देण्यात आली. देवळी येथे ३१० पीककर्जाची प्रकरणे निकाली काढून २ कोटी ८७ लाखांचे वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे ३३, पीककर्जाचे नूतनीकरण २७० तसेच पुनर्गठनाचे ७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. गिरोली या मंडळस्तरावर ५८ प्रकरणे निकाली काढून ३६ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे आठ, पीककर्जाचे नूतनीकरण ४२ तसेच पुनर्गठनाची आठ प्रकरणे करण्यात आली.
भिडी मंडळस्तरावर ५२ प्रकरणे निकाली काढून १८ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये नवीन प्रकरणे दोन, तसेच पीककर्ज नुतनीकरणाची ५० प्रकरणे निकाली काढण्यात आली. पुलगाव मंडळस्तरावर नवीन प्रकरणे १२, पीककर्जाचे नुतनीकरण, ९६ तसेच पुनर्गठनाची आठ प्रकरणे निकाली काढून ९० लाखाचे पीककर्ज वाटण्यात आले. अशी माहिती तहसील कार्यालयाच्यावतीने देण्यात आली. देवळी मंडळस्तरासाठी स्थानिक तहसील कार्यालयात शुक्रवारी आयोजित मेळाव्यात नवीन पीककर्जाची १० प्रकरणे तसेच पीककर्जाचे नुतनीकरण ४० व पुनर्गठनाचे सात प्रकरणे निकाली निघाली. मेळाव्याला उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, उपजिल्हाधिकारी पांडे, तहसीदार तेजस्विनी जाधव, नायब तहसीलदार स्रेहल ढोके व बी.एस. भागवत तसेच मंडळ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)
नियमांच्या आडकाठीने शेतकरी त्रस्त
देवळी मंडळात मेळाव्यात पीककर्जाच्या आशेने आलेल्या कास्तकारांच्या अनेक प्रकरणात बँकेचे नियम अडचणीचे ठरले. त्यामुळे अनेक कास्तकार पीककर्जापासून वंचित राहिले.
हिंगणघाट येथे उदासीनता
जिल्हाभर असलेल्या या कर्ज मेळाव्याकडे हिंगणघाट मंडळातील शेतकऱ्यांकडून विशेष सहकार्य मिळाले नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या मंडळात शेतकऱ्यांकडून कर्जाकरिता केवळ बँकेत गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे.