हिंगणघाट : मतदारसंघातील रस्त्यांचा अनुशेष दूर करण्याकरिता थंडबस्त्यात पडलेली पंतप्रधान ग्रामसडक योजना नव्याने राबविण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली. पंतप्रधान ग्रामसडक योजना ही ग्रामीण रस्ते जोडणीकरिता महत्त्वाकांक्षी योजना आहे. मागील वर्षापासून केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अतिदुर्गम भागातील रस्ते जोडल्या गेले. केवळ केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजना थंडबस्यात पडली असल्याचे माजी आमदार तिमांडे यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. २०१३ मध्ये वर्धा जिल्ह्याच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या आराखड्यात हिंगणघाट मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या समावेश आहे. यात धाबा ते वाघोली, सास्ती ते हडस्ती, आजंती, बोंडसुला ते आलगाव, हमदापूर ते सिंदी (रेल्वे), दहेगाव(गोंड)-सिंदी (रेल्वे), महागाव ते समुद्रपूर, नंदपूर ते नांदरा (हिवरा),कवडघाट ते कोपरा, जामणी ते किनगाव, सुलतानपूर ते सेलू, देऊळगाव ते हमदापूर, वडनेर ते येरणगाव, वासी-गिरगाव, हेलोडी- पळसगाव, बोंडसुला- हेलोडी, नांदरा-धानोली, शिवणगाव-भोसा, तुळजापूर, वाहितपूर, देऊळगाव-आष्टा, हिवरा, मांडगाव(जुने), परसोडी, सिंदी-गौळ, सिंदी-मांगली, दहेगाव-गणेशपूर, दहेगाव-बोंडसुला, सावली-काजळसरा, बोरगाव-सावंगी, पिंपळगाव-काजळसरा, सातेफळ, सुकळी-आजनगाव, चिकमोह, लसणपूर ते सायगव्हाण, वडगाव आदी रस्त्यांची कामे थंडबस्त्यात पडली आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बॅकलॉग दूर करण्याकरिता पंतप्रधान ग्रामसडक योजना राबवावी आणि मतदारसंघातील रस्त्यांकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार प्रा. तिमांडे यांनी पंतप्रधानांना निवेदनाद्वारे केली आहे.(तालुका प्रतिनिधी)
रस्त्यांच्या विकासासाठी ग्रामसडक योजना राबवा
By admin | Updated: August 2, 2015 02:39 IST