तहसीलदाराअभावी कामांचा खोळंबा
By Admin | Updated: July 1, 2015 02:43 IST2015-07-01T02:43:45+5:302015-07-01T02:43:45+5:30
येथील तहसील कार्यालयात गत एक महिन्यापासून तहसीलदार व नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत.

तहसीलदाराअभावी कामांचा खोळंबा
देवळी : येथील तहसील कार्यालयात गत एक महिन्यापासून तहसीलदार व नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या या संपूर्ण तहसील कार्यालयाचा कार्यभार एम.ए. सोनोने या एकमेव नायब तहसीलदाराकडे सोपविण्यात आला आहे. यामुळे कार्यालयात विविध कामाकरिता नागरिकांची झुबंड उडत आहे. विविध कामांकरिता तालुक्यातील विद्यार्थी व शेतकऱ्यांना कार्यालयाचे उंबरडे झिजवावे लागत आहे. तहसीलदार नसल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी तहसीलदार म्हणून जितेंद्र कुवर तर नायब तहसीलदार यादव कार्यरत होते. त्यांच्या बदलीनंतर सदर कार्यालय तब्बल २० दिवसांपर्यंत तहसीलदाराविना रामभरोसे ठेवण्यात आले होते. यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना आल्यापावली परत जावे लागत आहे. झाम न झाल्याने येथे आलेल्यांना महत्वपूर्ण कामाअभावी आर्थिक व मानसीक त्रासाला सामोरे जावे लागले. या कार्यालयात तहसीलदारांव्यतिरिक्त तीन नायब तहसीलदारांची पदभरती आहे. परंतु आजघडीला फक्त एका नायब तहसीलदाराच्या भरवश्यावर संपूर्ण तालुक्याचा गाडा ओढला जात आहे. त्यामुळे तहसील कार्यालयातील दैनंदिन कामाव्यतिरीक्त संजय गांधी निराधार व निवडणूकींची कामे खोळंबली आहे.
बैठकीअभावी मागील अनेक दिवसापासून संजय गांधी निराधाराची प्रकरणे खोळंबली आहे. पिककर्जाच्या कागदपत्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. शासनस्तरावर याची दखल घेवून येथील कार्यालयात तहसीलदार व नायब तहसीलदारांनी नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.(प्रतिनिधी)