धूळपेरणीचे बियाणे नष्ट; दुबार पेरणीचे संकट
By Admin | Updated: June 23, 2014 00:15 IST2014-06-23T00:15:16+5:302014-06-23T00:15:16+5:30
समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू तालुक्यात तसेच सिंदी रेल्वे, हमदापूर परिसरातील शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली; पण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बियाणे नष्ट झाले़ यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी,

धूळपेरणीचे बियाणे नष्ट; दुबार पेरणीचे संकट
हिंगणघाट : समुद्रपूर, हिंगणघाट, सेलू तालुक्यात तसेच सिंदी रेल्वे, हमदापूर परिसरातील शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली; पण मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बियाणे नष्ट झाले़ यामुळे शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली़ याबाबत उपविभागीय अधिकारी घनश्याम भूगावकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले़
मृग नक्षत्रात हिंगणघाट तालुक्यात ९० टक्के, समुद्रपूर ७० टक्के व सेलू तालुक्यात ८० टक्के धुळपेरणी करण्यात आली; पण पावसाच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. शेतकऱ्यांचे बियाणे वाया गेले़ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. या भागातील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा उभा राहावा म्हणून शासनाने त्वरित सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत सौरभ राजू तिमांडे यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांद्वारे उपविभागीय अधिकारी भूगावकर यांना निवेदन सादर करण्यात आले़ यावेळी प्रा. सचिन थारकर, विक्की वाघमारे, मुशीर पटेल, अनुकूल कोचर, आशिष मॅडमवार, प्रफुल भजभुजे, प्रवीण जनबंधू, राहुल तिवारी, सचिन उदासी, अजहर शेख, शकील अहमद, आदित्य शिंदे, चारूदत्त पाटील, सुनिल ठाकरे, चेतन भालेराव, देवेन मिलमिले, नदीम शेख, इनायत शेख, साहिल शेख आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)