जिल्ह्यात 32.32 टक्के लसीकरण तरीही ‘डेल्टा प्लस’ची भीती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 05:00 IST2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:21+5:30
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस तुटवड्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली, तर शुक्रवारी बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू होती. आरोग्य विभागाने लसीच्या एक लाख डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे.

जिल्ह्यात 32.32 टक्के लसीकरण तरीही ‘डेल्टा प्लस’ची भीती कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात आतापर्यंत कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ३ लाख ७८ हजार ३९४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. त्याची टक्केवारी ३२.३२ असली तरी, कोविडच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची भीती कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोविडच्या या नव्या व्हेरिएंटचा एकही रुग्ण सापडलेला नसून आरोग्यसह जिल्हा प्रशासनाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ५ हजार ४१९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला, तर ७२ हजार ९७५ व्यक्तींना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस तुटवड्यामुळे गुरुवारी जिल्ह्यात केवळ पाच केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली, तर शुक्रवारी बोटावर मोजण्याइतकीच केंद्रे सुरू होती. आरोग्य विभागाने लसीच्या एक लाख डोसची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. पण शुक्रवारी लस साठ्याचा पुरवठा झाला नव्हता. जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेचा प्रतिसाद लक्षात घेता शासनाकडून मुबलक लससाठा उपलब्ध होण्याची गरज आहे.
१८ ते ४४ वयोगटातील ५० हजार व्यक्तींना व्हॅक्सिनेशन
- जिल्ह्यात आतापर्यंत कोविड लसीचे ३ लाख ७८ हजार ३९४ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील सुमारे ५० हजार व्यक्तींचा समावेश आहे.
- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी, शासनाकडून अतिशय तोकडा लसीचा साठा पाठविला जात आहे.
कारंजा तालुक्यात कमी, तर वर्धा तालुक्यात झाले सर्वाधिक व्हॅक्सिनेशन
- जिल्ह्यात आतापर्यंत ३२.३२ टक्के लसीकरण झाले आहे. आठही तालुक्यांचा विचार केल्यास, वर्धा तालुक्यात सर्वाधिक, तर कारंजा (घा.) तालुक्यात सर्वात कमी व्हॅक्सिनेशन झाले आहे. तशी नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.