पाण्याची टाकी बांधकामाच्या चौकशीची मागणी धूळ खात
By Admin | Updated: November 13, 2015 02:10 IST2015-11-13T02:10:10+5:302015-11-13T02:10:10+5:30
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी...

पाण्याची टाकी बांधकामाच्या चौकशीची मागणी धूळ खात
पुलगाव : भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने २००७-०८ मध्ये ४० हजार लीटर पाणी साठवण क्षमता असलेली पाण्याची टाकी बांधकामास मंजुरी दिली. तत्कालिन राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुमारे चार वर्षांपूर्वी २८ लाख ६० हजार ५०० रुपये खर्चून टाकीचे बांधकाम झाले; पण निकृष्ठ दर्जाच्या बांधकामामुळे टाकीतून पाणी गळते. यमुळे ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी होत आहे. अद्याप चौकशी होत नसल्याने असंतोष पसरला आहे.
२००१ च्या जणगणनेप्रमाणे कवठा (रे.) येथील लोकसंख्या २२८२ इतकी होती. २००९ मध्ये २३४० तर २०२४ मध्ये २४३५ होईल, असा अंदाज आहे. गावात सात विहिरी व सात हातपंप आहेत. यातील पाणी पातळी खालावत असल्याने ग्रामस्थांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. ग्रामस्थांची गरज लक्षात घेत तेथे आठ वर्षांपूर्वी पाण्याची टाकी बांधण्यास मंजुरी देत शासनाने निधी उपलब्ध करून दिला. वर्धेच्या कंत्राटदारांनी चार वर्षांपूर्वी बांधकाम पूर्ण केले; पण निकृष्ठ बांधकामामुळे टाकीत पाणी राहात नाही. पाणी गळते, टाकी कधीही कोसळून अपघात होण्याची भीती आहे. यामुळे सध्या सदर टाकी शोभेची ठरत आहे. कवठा (झो.) येथील सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी सतत कंत्राटदारावर कारवाईची मागणी करीत आहेत. ग्रा.पं. च्या सर्वसाधारण सभा, ग्रामसभा, आमसभेत ग्रामस्थांनी गैरप्रकाराची चौकशी व्हावी, या मागणीचा पाठपुरावा केला. एक वर्षापूवी खा. रामदास तडस, जि.प. सदस्य राना रणनवरे यांनी जाहीर सभेत गैरप्रकाराची १५ दिवसांत चौकशी करण्याचे आश्वासन दिले; पण अद्यापही चौकशीला सुरूवात झाली नसल्याचे दिसते.
या सर्व बाबी ग्रा.पं. सरपंच व सचिवांच्या लक्षात असताना कंत्राटदाराची अंतिम देयके अदा करण्यात आली. यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहे. सतत पाठपुरावा करूनही चौकशी का होत नाही, देयक कसे देण्यात आले, याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)