ग्रा.पं.च्या पाणी पुरवठा योजनेचा निर्णय फेटाळला
By Admin | Updated: January 11, 2015 23:03 IST2015-01-11T23:03:22+5:302015-01-11T23:03:22+5:30
गावात पाण्याची सोय आहे, सार्वजनिक नळही आहे; मात्र ग्रामपंचायतीने एका कंपनीला नळ योजना लावण्यासह पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. या कंत्राटाला गावकऱ्यांनीन विरोध दर्शविला.

ग्रा.पं.च्या पाणी पुरवठा योजनेचा निर्णय फेटाळला
तळेगाव (श्या.पंत.): गावात पाण्याची सोय आहे, सार्वजनिक नळही आहे; मात्र ग्रामपंचायतीने एका कंपनीला नळ योजना लावण्यासह पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. या कंत्राटाला गावकऱ्यांनीन विरोध दर्शविला. यावरून बोलाविण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत नागरिकांनी ग्रामपंचायतीचा निर्णय फेटाळत गावात ग्रामपंचायतीनेच पाणी पुरवठा करावा असा निर्णय घेण्यात आला.
१५ ते १६ हजार लोकसंख्या असलेल्या या गावात पाण्याची व्यवस्था असताना नागरिकांना पाण्याकरिता भटकंती करण्याची वेळी आली आहे. गावात उंचवट्यावर असलेल्या नळांना पाणी पोहोचत नसल्याने ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०१२ रोजी आमसभा घेवून येथील नर्मदा कस्ट्रक्शन कंपनीला पाणी पुरवठा करण्याचा कंत्राट दिला. सदर कंत्राटदाराने नळाचे काम सुरू करताच सार्वजनिक नळ तोडण्याचा सपाटा सुरू केला. यावर गावकऱ्यांनी आक्षेप घेत तातडीने ग्रामसभा बोलावली.
पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून ही सभा चांगलीच गाजली. यावेळी पाणीपुरवठ्याच्या कंत्राटीकरण थांबविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सोबतच गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात नव्याने पाणी पुरवठा समितीची स्थापना झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी ग्रा.पं.सदस्य विवेक केचे होते. यावेळी सरपंच सुनीता उईके, उपसरपंच दामोधर ठाकरे, सचिव तिवटे यांची उपस्थिती होती.(वार्ताहर)