शेतकऱ्यांच्या वीज जोडणी बंदीचा निर्णय घातकी
By Admin | Updated: January 10, 2015 01:45 IST2015-01-10T01:45:11+5:302015-01-10T01:45:11+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडणीवर बंदी घातली आहे. त्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला.

शेतकऱ्यांच्या वीज जोडणी बंदीचा निर्णय घातकी
वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना देण्यात येणार असलेल्या कृषी पंपाच्या वीज जोडणीवर बंदी घातली आहे. त्यांना सोलर पंप देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शेतकऱ्यांकरिता घातकी असल्याचा आरोप करीत शुक्रवारी जिल्हाकचेरीसमोर महात्मा फुले समात परिषदेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
विदर्भ मराठवाड्याचा शेतकरी हा दुष्काळाने होरपलेला आहे. त्याला शासनाच्या मदतीची आणि पाठींब्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांबद्दल या सरकारला सहानुभूती नाहीच, पण शेतकऱ्याला नेस्तनाबुत करून फक्त उद्योगपती आणि व्यापारी यांच्या लाभाचे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी, शेतकऱ्यांच्या शेती पंपाना विज दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवर चार हजार कोटींचा बोजा पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नविन विजकनेक्शन दिले जाणार नाही, असा तुघलकी निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांना साडे सहा लाख रुपयाच्या सोलर पंपाचे गाजर दाखवून कृषी पंपाला वीज जोडणी देण्याची अघोषित बंदी केल्याचा आरोप करीत निदर्शने करण्यात आली.
यावेळी परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, विनय डहाके, विजय मुळे, किशोर तितरे, संजय म्हस्के, संजय भगत यांची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)