उपचाराविना राहिलेल्या तरूणाचा २२ दिवसानंतर मृत्यू
By Admin | Updated: February 25, 2016 02:08 IST2016-02-25T02:08:16+5:302016-02-25T02:08:16+5:30
समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथील सुनील पुरूषोत्तम वहारे यास सार्वजनिक ठिकाणी दोघांनी अमानुषरित्या मारहाण केली.

उपचाराविना राहिलेल्या तरूणाचा २२ दिवसानंतर मृत्यू
अमानुष मारहाण : पोलीस अधीक्षकांना तक्रार
वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नारायणपूर येथील सुनील पुरूषोत्तम वहारे यास सार्वजनिक ठिकाणी दोघांनी अमानुषरित्या मारहाण केली. या जखमी झालेल्या सुनीलचा पैशाअभावी उपचाराविनाच २२ दिवसानंतर मृत्यू झाला. याबाबतची तक्रार त्याच्या परिवारातील सदस्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली असून सबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
वहारे परिवाराने दिलेल्या तक्रारीनुसार सुनील हा भाजीपाला विकणे, आॅटोरिक्षा चालविणे व सायंकाळी पाण्याच्या बाटल्या विकून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. १ फेब्रुवारी रोजी पैशाच्या कारणातून नारायणपूर गावातीलच प्रशांत मधुकर छापेकर व पप्पू मधुकर छापेकर यांनी त्याच्यासोबत वाद घातला. शेंडे यांच्या घरासमोर हा वाद झाला. छापेकर बंधुंनी सुनीलला लाथाबुक्यांनी व लाकडी फळीने छातीवर, पोटावर, पाठीवर व गुप्तांगावर अमानुषरित्या मारहाण केली. तसेच त्याला उचलून रस्त्यावर आदळले. यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. यावेळी अनेकजण उपस्थित होते. पण कुणीही वाद सोडविण्याची हिंमत केली नाही. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांना छापेकर बंधुंनी वादात आले तर मारून टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे सुनीलला वाचविण्याकरिता कोणीही धावले नाही. सुनीलची आई कालिंदा पुरूषोत्तम वहारे यांनी सुनीलला सोडवून घरी आणले. तेव्हापासून त्याची प्रकृती बिघडत गेली. पैशाअभावी त्याच्यावर उपचारही झाले नाही. छापेकर बंधुंच्या भीतीमुळे पोलिसांकडे तक्रार नोंदविली नाही, असेही तक्रारीत नमूद केले.
सुनीलची प्रकृती जास्तच बिघडत गेल्यामुळे शुक्रवारी २२ फेब्रुवारीला त्याला हिंगणघाटच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला सेवाग्राम रूगणालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
सुनीलला कुठलाही आजार नव्हता. मारहाणीमुळेच त्याचा मृत्यू झाला असून घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी वहारे परिवाराने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. पोलीस प्रशासन या तक्रारीची कितपत दखल घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)