अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:11+5:30
पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. तर नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नाल्याचा पूर शेतातून गेल्याने उभी पीक धाराशाही झाली. तर घरांचीही पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे कपाशीची पाने पिवळी पडत असून पानगळ सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
केळझर : गेल्या काही दिवसांपासून पावसाची दररोज हजेरी सुरू आहे. सततच्या पाऊस आता शेतीपिकांना नकोसा झाला आहे. पावसाने आता काही दिवसांची उसंत द्यावी असे शेतकऱ्यांना वाटत असताना दीड तास झालेल्या पावसामुळे अनेक शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.
पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. तर नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नाल्याचा पूर शेतातून गेल्याने उभी पीक धाराशाही झाली. तर घरांचीही पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे कपाशीची पाने पिवळी पडत असून पानगळ सुरू झाली आहे.
शिवाय सोयाबीनच्या शेंगाची गळती सुरू झाल्याचे शेतकरी सांगतात. तुरीच्या झाडांचे पान गळत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. येथील शेतकरी रमेश कोपटकर यांचे मौजा केळझर येथे शेत आहे. त्या शेताला लागूनच मोठा नाला आहे. पावसामुळे या नाल्याला पूर आला. शिवाय पुराचे पाण्याने शेतातून वाट काढल्याने त्यांच्या शेतातील उभी पीक धाराशाही झाली. शिवाय शेतातील मातीही वाहून गेली. यामुळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच येथील वॉर्ड क्र.१ मधील सुरेश जगन दातीर यांचे घर कोसळले. या घरात कुणीच राहात नसल्याने जीवितहानी टळली. सदर नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने शासकीय मदतीची अपेक्षा आहे.