बंधाऱ्याच्या ‘बॅक वॉटर’मुळे पीक जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:20+5:30
शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरातील भाग जलमय होवून पाण्याची पातळी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : स्थानिक यशोदा नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतात तलाव सदृष परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे तब्बल साडेचार एकरातील कपाशीचे पीक पूर्णत: नष्ट झाल्याने शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. याची दखल घेत आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्याने खासदार रामदास तडस, तहसीलदार राजेश सरवदे यांना निवेदनातून केली आहे.
स्थानिक यशोदा नदी व ईसापूर नदीच्या संगम पॉर्इंटवर देवळी येथील शेतकरी प्रकाश गोविंद फिसके यांचे साडेचार एकर शेत आहे. त्यांनी शेतात हंगामाच्या सुरूवातीलाच मोठ्या प्रमाणात खर्च करून कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक चांगले आले असताना तसेच डवरणी व खते देण्याची कामे पूर्णत्त्वात गेली असतानाच मंगळवारी रात्री झालेल्या दमदार पावसाने नदीवरील बंधाऱ्याचे बॅकवॉटर शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने उभे पीक पाण्याखाली गेले. शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरातील भाग जलमय होवून पाण्याची पातळी वाढणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. परंतु, केंद्र शासनाच्या या कामात कोणतेही नियोजन नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यशोदा नदी व ईसापूर नदी पात्राचे खोलीकरण तसेच नदीच्या आजूबाजुला भरावा देण्याचे काम अजूनपर्यंत हाती घेण्यात न आल्यामुळे ही परिस्थिती शेतकऱ्यांवर ओढवली असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनस्तरीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
पाच कोटी खर्चून बंधारा निर्माणाधीन
शासनाच्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामार्फत नाविन्यपूर्ण योजनेतून यशोदा नदीवरील बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात येत आहे. हा बंधारा सुमारे पाच कोटी रूपये खर्चून बांधण्यात येत असला तरी याकडे मात्र, शासनाचेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. देशस्तरावर बांधण्यात येत असलेल्या पाच बंधाऱ्यांपैकी हा एक बंधारा असल्याचे सांगितले जात आहे. पण, शासनाच्या नियोजनशुन्यतेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बंधाऱ्यातील बॅकवॉटर शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.