पीक कर्ज वाटप थांबले; शेतकरी त्रस्त

By Admin | Updated: June 20, 2014 00:00 IST2014-06-20T00:00:59+5:302014-06-20T00:00:59+5:30

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा

Crop loan allocation stopped; Farmers suffer | पीक कर्ज वाटप थांबले; शेतकरी त्रस्त

पीक कर्ज वाटप थांबले; शेतकरी त्रस्त

सुकळीच्या बँकेचा प्रताप : शाखा व्यवस्थापकाचे पद १५ दिवसांपासून रिक्त
आकोली : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा निपटारा थांबला आहे़ शेतकरी दररोज आशाळभूत नजरेने बँकेने जातात; पण त्यांना कर्ज पुरवठा होत नाही़ बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
पावसाळा दारात आला आहे़ शेती मशागतीची कामे पूर्ण झलीत़ काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्यात़ सुकळी (बाई) शाखेचा नियमित कर्जदार शेतकरी पतपुरवठा थांबल्याने रडकुंडीस आला आहे. शाखेत आधीच कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांवर बँकेचा कारभार चालविला जात आहे. अशातच शाखा व्यवस्थापकाची १५ दिवसांपूर्वी बदली झाली. पीक कर्ज वाटपाचा हंगाम असल्याने बँक प्रशासनाने त्वरित दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ नवीन अधिकारीच येण्याची प्रतीक्षा न करता जुन्या अधिकाऱ्याने येथून काढता पाय घेतला व नवीन अधिकारीही आला नाही़ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे.
गत १५ दिवसांपासून दररोज कृषी कर्जाची प्रकरणे बँकेत येत आहे; पण कर्ज मंजूर करायला अधिकारीच नाही़ बँकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना कर्ज मंजुरीचे अधिकार नाहीत़ केवळ खात्यात जमा असलेली रक्कम अदा (पे-कॅश) करण्याचाच अधिकार त्यांना आहे. यामुळे सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे़ शेतकऱ्यांचा संताप टाळण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्याचे दिसते़ शेतकरी दररोज बँकेत चकरा मारत आहे; पण उपयोग होत नाही़ कृषी सेवा केंद्रातून उधारीवर बियाणे मिळत नाही. खिशात पैसा नाही. बँकेवर भिस्त होती; पण पेरणीचा हंगाम सुरू होऊनही कर्ज न मिळाल्याने शेतकरी हताश झाला़
परिसरातील शेतकऱ्यांच्या पेरण्या व बियाणे खरेदी यामुळे खोळंबल्याचे दिसते़ बियाणे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना खरेदी करता येत नाही़ यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापक नेमावा किंवा कर्ज प्रकरणांसाठी तात्पुरता अधिकारी पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)

Web Title: Crop loan allocation stopped; Farmers suffer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.