आरटीईचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही
By Admin | Updated: May 1, 2016 02:14 IST2016-05-01T02:14:15+5:302016-05-01T02:14:15+5:30
आरटीई कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही;

आरटीईचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही
प्रशासनाला निवेदन : मुख्याध्यापक संघाचा इशारा
वर्धा : आरटीई कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही; पण शासन मान्यतेनुसार अनेक खासगी माध्यमिक शाळा सुरू आहेत. कोणतेही लेखी आदेश नसताना, अंतराच्या निकषात न बसणाऱ्या शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करणाऱ्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनावर फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्यात.
जि.प. शाळांनी सरसकट पाचवी व आठवी जोडण्याचा सपाटा सुरू केला. यामुळे शिक्षणाचा अधिकार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा शाळा व मुख्याध्यापकांवर नियम कलम १८(५) नुसार एक लाख आणि प्रतिदिवस १० हजार रुपये दंड आणि फौजदारी कार्यवाहीचे प्रावधान आहे. अशा शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा दाखला रोखून धरल्यास निकालानंतर प्रतिदिवस १० हजार रुपये प्रतिविद्यार्थी प्रमाणे दंडात्मक कार्यवाहीचे निकष आहे. जिल्ह्यात या आरटीई कायद्याला पायदळी तुडवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत विनापरवानगीने, नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात कसूर केला जाणार नाही. याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाल्या असून प्रखर विरोध करणार असल्याचे मुख्या. संघाचे जिल्हा सचिव सतीश जगताप यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)