सततच्या पावसाने कपाशी, सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:34+5:30
तालुक्यात आजपर्यंत ९०० मि.मी. पाऊस झाला असून सततच्या पावसाने शेतकरी रासायनिक खताची मात्रा, किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी योग्यरीत्या करू शकत नसल्याने खरिपातील ही दोन्ही पिके धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : तालुक्यात पावसात सातत्य कायम असल्याने कपाशीची पाती गळ सुरू असून, सोयाबीनच्या शेंगाही भरणार नाही, अशी सद्यस्थिती आहे. यामुळे कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
तालुक्यात आजपर्यंत ९०० मि.मी. पाऊस झाला असून सततच्या पावसाने शेतकरी रासायनिक खताची मात्रा, किडीचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी योग्यरीत्या करू शकत नसल्याने खरिपातील ही दोन्ही पिके धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. यावेळी ४८ हजार १४१ हेक्टरमध्ये लागवड असून यात ३० हजार ५१० हेक्टर क्षेत्रात कपाशीचे पीक, तर १० हजार ५० हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक शेतकरी घेत आहेत.
सोयाबीन पिकाच्या मळणीच्या दिवसाला अवघे काही दिवस शिल्लक आहे. नवरात्रोत्सव ते दिवाळी या दरम्यान साधारणत: मळणीचा हंगाम असतो; पण सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाहीत. पावसाने विश्रांती घेतली तर तर सोयाबीनची मळणी योग्य होईल. त्यामुळे सोयाबीनचे पीक कितपत साथ देते, याबाबत साशंकता आहे. पाणबसन क्षेत्रातील कपाशीचे पीक पूर्णत: धोक्यात सापडले आहे. तर कपाशीची मोठ्या प्रमाणावर पातीगळ होत असल्याने तूर्तास कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
तुरीचे पीक धोक्यात
पाऊस थांबला नाही व सतत असाच सुरू राहिल्यास कपाशी व सोयाबीन पिकामध्ये असलेले तुरीचे आंतरपीकही धोक्यात येईल, अशी शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
या वर्षी खरीप हंगाम चांगला होईल , अशी आशा होती; पण पाऊस थांबण्याचे नावच घेत नसल्याने शेतात फवारणी करता येत नाही. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगाही भरल्या नाही. कपाशीची फुले बोंड पकडण्यापूर्वीच गळत आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या हतबल होण्याची वेळ आली आहे.
मधुकर जानबा महाकाळकर, शेतकरी.
पावसाने उघडीप झाल्यास सुधारणा होऊ शकते; पण सततच्या पावसामुळे कपाशीमध्ये पातीगळ होत आहे. तसेच आंतरिक बदल होत असल्याने किडीच्या डंकामुळे पातीफाक होऊन पाती फुलावर येताच गळत आहे. त्याकरिता प्लोनोफिक्स ५ ते ७ मिलीलिटर प्रती पंप या प्रमाणात फवारणी करावी.
मंगेश ठाकरे, कृषी सहाय्यक, सेलू.