आचारी व्यवसायाला लागले कोरोनाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 05:00 IST2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:12+5:30
कोरोनामुळे संपूर्ण जग जागीच थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकी व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी खबरदारी म्हणून समारोह कौटुंबिक सोहळयांवर अटी लादून दिल्या आहेत.

आचारी व्यवसायाला लागले कोरोनाचे ग्रहण
लोकमत न्यूज नेटवर्क
गिरड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने छोट्या व्यावसायिकांना मोठी कसरत करावी लागत आहे . विविध मोठ्या समारंभात रुचकर भोजन बनविणाऱ्या आचाऱ्यांच्या जीवनात तर मिठाचा खडाच पडला आहे. त्यामुळे उदरनिर्वाहाचे मोठे संकट स्वयंपाकींसमोर आले असून आचारी व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण जग जागीच थांबले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून स्वयंपाकी व्यवसाय ठप्प आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यांत शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी खबरदारी म्हणून समारोह कौटुंबिक सोहळयांवर अटी लादून दिल्या आहेत.
समारंभात रुचकर भोजन बनविणाºया आचारींच्या व्यवसायाला कोरोनाचे ग्रहण लागले आहे.
त्यामुळे सध्या हा व्यवसाय कोलमडल्याचे चित्र आहे. मोठ्या समारोहात किंवा लग्नसोहळ्यात स्वयंपाकींची रेलचेल असते. आलेले पाहुणे रुचकर भोजन करून तृप्त व्हावे, अशी भावना असते. परंतु, यंदा समारोहांवर बंदी असल्याने स्वयंपाकी आर्थिक अडचणीत सापडले आहे. शासनाने याचा विचार करून त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची मागणी स्वयंपाकींकडून करण्यात येत आहे.
उदरनिर्वाहची घडी विस्कटली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हळद आदी कार्यक्रम घरीच होत आहेत . शासनाच्या नव्या नियमानुसार अल्प प्रमाणात विवाह सोहळे पार पडत आहेत.परंतु, जेवणाचे ऑर्डर मिळत नाही. तीन महिन्यांपासून व्यवसाय थंडबस्त्यात आहे. येथील २५ स्वयंपाकी आणि त्यांच्या सोबतचे मदतनीस यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर होता. परंतु, सार्वजनिक सोहळ्यांवर बंदी असल्याने मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे सुरू असल्याचे स्वयंपाकी बाळा बावणे यांनी सांगितले. आमचाही विचार करून आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी स्वयंपाकींकडून करण्यात येत आहे.