विजेच्या धक्क्याने कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू
By Admin | Updated: December 5, 2015 09:08 IST2015-12-05T09:08:24+5:302015-12-05T09:08:24+5:30
वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा खांबावर बिघाड काढण्याकरिता चढला असता विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

विजेच्या धक्क्याने कंत्राटी वीज कामगाराचा मृत्यू
आप्तेष्टांकडून मदतीकरिता महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक
वर्धा : वीज वितरण कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा खांबावर बिघाड काढण्याकरिता चढला असता विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. किशोर श्रावण टेकाम (३३) रा. गोमाजी वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे.
या कर्मचाऱ्याला मदत देण्याच्या मागणीकरिता शुक्रवारी मृतकाच्या आप्तेष्टांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली. यावर अधीक्षक अभियंता देशपांडे यांच्या मध्यस्थीने कंत्राटदाराने ही मागणी मान्य केली. प्रारंभी ५० हजार रुपये रोख व दोन लाख रुपयांचा धनादेश मृतकाच्या वडिलांच्या स्वाधीन केला. शिवाय उर्वरीत रक्कम देण्यासंदर्भात मुद्रांकावर लेखी दिले आहे.
हिंगणघाट येथील किशोर टेकाम हा धनश्री इलेक्ट्रीकल्स या कंपनीच्या माध्यमातून महावितरणमध्ये काम करीत होता. गुरुवारी सावंगी येथील एका कामावर असताना त्याचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. असे असताना सदर कंपनीचे संचालकाने घटनास्थळी येवून पाहिले नसल्याचा आरोप करीत आप्तेष्टांनी अधीक्षक अभियंता देशपांडे यांना कार्यालयात जात घेराव घातला. यावेळी त्यांनी कत्राटदाराशी संपर्क साधत मृतकाच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे सांगितले. त्यांच्या मध्यस्थितीने मृतकाच्या वडिलांना रोख ५० हजार रुपये व दोन लाख रुपयांचा धनादेश दिला. उर्वरीत रक्कम मिळणाऱ्या विम्याच्या रकमेतून देण्यात येईल, असे मुद्रांकावर लेखी दिले. यावेळी हिंगणघाट पालिकेचे नगरसेवक शंकर मोहमारे, किसना राऊत, राजू टिचूकले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)