आता वर्ध्यात ‘सशर्त शिथिलता’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:45+5:30

आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी काढलेल्या आदेशानुसार, गर्दी टाळण्यासाठी आर्वी न.प.च्या हद्दीतील आस्थापना आळीपाळीने सुरू राहणार आहे. किराणा दुकाने सोमवार, बुधवार व शनिवारी तर इतर आस्थापना मंगळवार, गुरूवार व रविवारी सुरू राहणार आहेत. ठेल्यावर भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्यांनी निवासी क्षेत्रात फिरावे.

‘Conditional laxity’ in Wardha now | आता वर्ध्यात ‘सशर्त शिथिलता’

आता वर्ध्यात ‘सशर्त शिथिलता’

ठळक मुद्देबाजारपेठ उघडण्यासाठी हिरवी झेंडी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर व्यावसायिकांमधील संभ्रम दूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन कायम आहे. याच लॉकडाऊनच्या काळात विस्कळलेली अर्थव्यवस्था पुन्हा पुर्वस्थितीवर आणण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कोरोनाबाबतच्या ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन मध्ये काय निर्बंध कायम राहिल तसेच कुठल्या गोष्टीत शिथिलता देण्यात येत आहे, याबाबतची घोषणा केली. परंतु, या घोषणेनंतरही वर्धा जिल्ह्यातील छोट्या व मोठ्या व्यावसायिकांमध्ये अनेक संभ्रम कायम होते. त्यामुळे सोमवारी व्यापाऱ्यांनीही कारवाईच्या भीतीमुळे आपली प्रतिष्ठाने उघडली नाहीत. आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम व अटींवर बाजारपेठतील दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे व्यापाऱ्यांमधील संभ्रम दूर झाला. आता कोणती दुकाने केव्हा आणि किती वेळ उघडी ठेवावी याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. नियमांचे पालन करीत दुकानदारांना प्रतिष्ठाने सुरू करावी लागणार आहे.

वर्धा उपविभाग
एसडीएम वर्धा यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्धा न.प. हद्दीतील किराणा, सराफा, आॅप्टिकल, हार्डवेअर, पेंट, टाईल्स, फर्निचर फोटो फ्रेमिंग, ड्रायक्लिन, सिमेंट-लोहा, टेलरिंग, कुशन वर्क्सची दुकाने गुरूवार ते रविवारपर्यंत, मोबाईल शॉपी, इलेक्ट्रानिक्स, इलेक्ट्रीक्स, स्टेशनरी, गिफ्ट हाऊस, जनरल स्टाअर्स, कापड व रेडीमेट कपड्याची दुकाने, बुक स्टॉल, झेरॉक्स, भांड्याची दुकाने, चप्पल जोड्याचे दुकाने, आॅटोमोबाईल्स गॅरेज, स्पेअर पार्ट, प्रिंटींग, वेल्डिंग, ई-सेवा केंद्र सोमवार ते बुधवार या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंंत सुरू ठेवण्याची मुभा ६ मे ते १७ मे पर्यंत दिली आहे.

हिंगणघाट उपविभाग
हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांनी आर्वी व वर्धा उपविभागीय महसूल अधिकाºयांसारखा दुकाने कुठल्या दिवशी उघडी ठेवता येईल याबाबतचा आदेश मंगळवारी रात्री ९ वाजतेपर्यंत निर्गमित केलेला नव्हता. त्यांच्याकडून लोकमतच्या प्रतिनिधीने अधिकची माहिती जाणून घेतली असता दक्षता म्हणून वाहतूक संदर्भातील आदेश काढल्याचे तसेच बुधवारी काय परिस्थिती उद्भवते यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगितले. गर्दी होऊ नये म्हणून काही मार्गावरील वाहतूक तात्पूर्ती बंद करण्यात आली आहे हे विशेष.

आर्वी उपविभाग
आर्वीचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक यांनी काढलेल्या आदेशानुसार, गर्दी टाळण्यासाठी आर्वी न.प.च्या हद्दीतील आस्थापना आळीपाळीने सुरू राहणार आहे. किराणा दुकाने सोमवार, बुधवार व शनिवारी तर इतर आस्थापना मंगळवार, गुरूवार व रविवारी सुरू राहणार आहेत. ठेल्यावर भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्यांनी निवासी क्षेत्रात फिरावे. कुणीही नेहरू मार्केट व इतर ठिकाणी रस्त्याच्याकडेला थांबून या जीवनावश्यक वस्तूची विक्री करू नये. किराणा व इतर आस्थापना एकत्रित असल्यास कुठल्याही एका कालावधीत दुकाने सुरू ठेवता येणार आहे.

शिथिलतेनंतरचे निर्बंध आणि सूट
- सुरक्षेच्या उद्देशाशिवाय रेल्वे मधील सर्व प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे.
- आंतरराज्यीय तसेच आंतरजिल्हा सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा पुर्णत: बंद राहणार आहे.
- वैद्यकीय कारणे वगळता आंतरराज्यीय वाहतूक पूर्णपणे बंद राहिल.
- सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण, कोचिंग क्लासेस बंद राहतील. परंतु, आॅनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम चालू राहली.
- हॉस्पीटॅलिटी सेवा पूर्णत: बंद राहिल. शिवाय केवळ पोलीस वैद्यकीय कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या व्यक्ती यांच्याकरिताच सदर सेवा सुरू राहणार आहे.
- चित्रपटगृह, शॉपिंग मॉल, व्यायामशाळा, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, सभागृह तसेच असेंबली हॉल व तत्सम ठिकाणे बंद राहतील.
- सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतीक, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे बंद राहतील.
- सर्व धार्मिक स्थळ, पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद राहतील.
- सलून, ब्युटी पार्लर, स्पा, पानटपरी, तंबाखू जन्य पदार्थ विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
- जिल्ह्याबाहेरून भाजीपाला, फळ व मांस आणण्यावर बंदी राहणार आहे. केवळ अपलोड पॉर्इंटचा वापर करून कांदा, आलू, अद्रक, लसूण व फळे वर्ध्यात आणता येणार आहे.
- अ‍ॅपे वाहतूक बंद राहणार आहे.
- व्यावसायिकांनी दुकाने उघडल्यानंतर दुकानाचे तसेच हाताळण्यात येणाºया वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहणार आहे.
- ग्राहकांना हात धुण्याची सुविधा व्यावसायिकांना करावी लागणार आहे.
- तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन साहित्याची खरेदी-विक्री होताना होणे क्रमप्राप्त आहे.
- आजारी व्यक्तीला दुकानात कामावर बोलावण्यात येऊ नये.
- बाहेर जिल्ह्यातून येणारा माल लोकवस्तीच्या दूर असलेल्या अपलोडिंग पॉर्इंटवर निर्जंतुक करून त्यानंतरच तो माल शहरात व गावात आणणे बंधनकारक राहणार आहे.
- दुकान किंवा व्यावसायिक प्रतिष्ठानांसमोर कुठल्याही परिस्थिती नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता व्यावसायिकांना घ्यावी लागणार आहे.
- नागरिकांची गर्दी झाल्यास व्यावसायिकाने दुकान तात्काळ बंद करून याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक राहणार आहे.
- सर्व प्रकारच्या कामकाजाकरिता सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत मुभा राहणार आहे. तर दुपारी २ नंतर विनाकारण फिरताना आढळणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
- सर्व दुकाने बाजारपेठा वर्कशॉप हे सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवता येणार आहे. शिवाय सर्व प्रकारच्या माल वाहतुकीसाठी लोकवस्तीच्या दूर अपलोडिंग पॉर्इंटवर इतर जिल्ह्यातून आलेला माल सॅनिटाईज करून तो शहरात तसेच गावात आणता येणार आहे.
- आॅटोरिक्षा सुरू ठेवता येईल; पण आॅटो रिक्षा चालकाने चालकासह एकूण तीन व्यक्तीना वाहनात बसून प्रवासी वाहतूक करणे क्रमप्राप्त राहणार आहे.
- हॉटेल, खानावळ, रेस्टॉरेंट सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत सुरू ठेवता येणार असली तरी केवळ होम डिलेव्हरी व काऊंटर सुविधा सुरू ठेवता येणार आहे.
- यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या उद्योग, विविध आस्थापनांना नव्याने परवानगी घेण्याची आवश्यक्ता राहणार नाही.
- बस सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे. बस डेपोच्या क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने डेपो सुरू करता येणार असून प्रवासी वाहतूक केवळ जिल्ह्याअंतर्गत करता येणार आहे. जिल्ह्याबाहेर प्रवासी वाहतुकीस बंदी राहील.

Web Title: ‘Conditional laxity’ in Wardha now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.