बसफेरी बंद केल्याने प्रवाश्यांचे हाल
By Admin | Updated: March 7, 2016 01:59 IST2016-03-07T01:59:33+5:302016-03-07T01:59:33+5:30
राज्य परिवहन महामंडळांतर्गत असलेल्या तळेगाव आगाराने तारासावंगा मार्गावरील बसफेरी बंद केली आहे.

बसफेरी बंद केल्याने प्रवाश्यांचे हाल
आष्टी (शहीद) : राज्य परिवहन महामंडळांतर्गत असलेल्या तळेगाव आगाराने तारासावंगा मार्गावरील बसफेरी बंद केली आहे. विभागाला आर्थिक उत्पन्न देणारी बसफेरी बंद केल्याने याबाबत प्रवाश्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. आगार व्यवस्थापकाच्या मनमानी कारभाचा फटका तारासावंगा, माणिकवाडा येथील प्रवाश्यांना सहन करावा लागत आहे.
या मार्गावारील बसफेरी त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामसभेत ठराव घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची प्रत पाठविली आहे. यावर कार्यवाहीकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
तळेगाव आगार अंतर्गत तळेगाव, आष्टी, साहुर, माणिकवाडा, तारासावंगाकरिता बस रात्री ७.४५ या वेळेत तळेगाव येथून सुटत होती. ही बस रुग्ण, शालेय विद्यार्थी यांना सोयीची होती. आष्टीपासून तारासावंगा हे गाव २५ किमी अंतरावर आहे; पण १५ दिवसांपूर्वी आगार व्यवस्थापक ढाणगे यांनी ही बसफेरी बंद केली. तसेच रात्रीच्या वेळेतील बस सकाळी ६ वाजता सुरू केली आहे. यावेळी प्रवासी संख्या कमी असते. शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास विलंब होतो. येथील नागरिकांचे दिवसभराचे नियोजन या बसफेरीवर अवलंबून आहे; पण तळेगाव आगार व्यवस्थापकांना ही बाब सांगितली तरीही त्यांनी वेळेत बदल केला. ही बसफेरी शनिवार, रविवार व सणाच्या दिवशी बंद असते. या संदर्भात शाळकरी विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. त्यानंतर पुन्हा बस सुरू झाली होती; पण रात्रीची फेरी बंद करून समस्येत भर टाकली आहे.
तारासावंगा येथील सरपंच रत्नपाल पाटील, माणिकवाडा सरपंच तारा खवशी यांनी १ मार्च रोजी तळेगाव आगार व्यवस्थापक यांच्यासमोर ठरावाद्वारे ही समस्या मांडली; पण अद्याप बसफेरी सुरू केली नाही. आठवडाभरात बसफेरी सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.(प्रतिनिधी)