वर्षाकाठी पालिकेला सरासरी ६.१६ लाखांचा सफाई कर
By Admin | Updated: June 13, 2014 00:21 IST2014-06-13T00:21:18+5:302014-06-13T00:21:18+5:30
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील

वर्षाकाठी पालिकेला सरासरी ६.१६ लाखांचा सफाई कर
रूपेश खैरी - वर्धा
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याकरिता पालिकेच्यावतीने शहरवासीयांकडून सफाई कर वसूल केले जाते. या करापोटी पालिकेला वर्षाकाठी सरासरी ६.१६ लाख रुपये शहरातून मिळतात. असे असले तरी शहरातील रस्त्यारस्त्यावर कचऱ्यांची आरास दिसत असल्याने स्वछतेचे वाभाडे निघत आहे.
शहरातील नागरिकांना मूलभूत सविधा देण्याची जबाबदारी पालिकेची आहे. ही जबाबदारी पार पाडण्याकरिता पालिकेला आवश्यक असलेली रक्कम मिळविण्याकरिता शहरवासीयांकडून कर वसूल करण्यात येतो. हा कर वसूल करताना शासनाच्या सूचनेनुसार विविध शाखा तयार करून त्या माध्यमातून कर वसूल केला जात आहे. पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असलेल्या करापैकी बरीच रक्कम पालिकेला मिळत नसून ती थेट शासनाच्या तिजोरीत जात असल्याचे समोर आले आहे; मात्र सफाई कराचे तसे नाही. वसूल झालेल्या सफाई करावर पालिकेचा अधिकार आहे.
शहरवासीयांकडून वर्षाकाठी वसूल होत असलेल्या कराच्या रकमेतून शहरात स्वच्ठता ठेवण्यात येत आहे. गत आठ वर्षांत शहरातून पालिकेच्यावतीने ४९ लाख ३१ हजार ३९० रुपयांचा कर वसूल करण्यात आला असल्याचे माहिती एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अधिकाराचा वापर करून समोर आणले आहे. एवढा कर वसूल करण्यात आला असला तरी पालिकेच्यावतीने स्वच्छतेच्या नावावर शहरवासीयांना कुठल्याही ठोस सुविधा दिल्या नसल्याचे समोर आले आहे. शहरातील रस्त्यारस्त्याचर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले आहेत. त्यातून दुर्गंधी पसरत असून त्याचा विपरित परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. शिवाय डासांचे प्रमाण वाढल्याने शहरात डेंग्यूची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे. शहरातील नाल्या कचऱ्याने तुुंबल्या आहेत. पालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविल्या जात आहे. ती शहरातील बाजार परिसरातच असून शहराच्या इतर भागात मात्र या मोहिमेचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या अजूनही तुंबलेल्या स्थितीत असून त्या स्वच्छ करण्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात या नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर त्याचे सोयरे सुतक पालिकेला नसल्याचे वास्तव असल्याचे चित्र आहे. वर्षाकाठी सहा लाखांचा कर देणाऱ्या वर्धा शहर वासींयाच्या माथी घरात पाणी जाण्याची वेळ आल्यास त्यांनी दिलेला हा कर त्यांच्या काय उपयोगाचा, असा प्रश्न पालिकेच्या कर वसुली पथकाला नागरिकांनी विचारल्यास आश्चर्य वाटू नये.