शहराचा पाणी पुरवठा गुरूवारपर्यंत ठप्प
By Admin | Updated: June 5, 2016 01:51 IST2016-06-05T01:50:58+5:302016-06-05T01:51:54+5:30
शहराला पाणी पुरविण्याकरिता पवनार येथून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलाईन आरती चौक येथे लिकेज झाली आहे.

शहराचा पाणी पुरवठा गुरूवारपर्यंत ठप्प
पाईपलाईनचे काम सुरू : दुरूस्तीला लागणार सहा दिवस
वर्धा : शहराला पाणी पुरविण्याकरिता पवनार येथून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ही पाईपलाईन आरती चौक येथे लिकेज झाली आहे. परिणामी, शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पाईपलाईनच्या दुरूस्तीला गुरूवारपर्यंत कालावधी लागणार असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. परिणामी, नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
वर्धा शहराला पवनार येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी पवनार ते वर्धा पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. या पाईपलाईनच्या माध्यमातून वर्धेतील पाण्याच्या टाकीत पाणी घेतले जाते. सदर पाईपलाईन आरती चौक परिसरात फुटली आहे. काही दिवसांपूर्वीही याच भागात पाईपलाईन दुरूस्तीचे काम करण्यात आले होते. आता पुन्हा पाईपलाईन फुटल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पाण्याच्या टाकीमध्ये उपलब्ध पाणी शुक्रवारी सकाळी शहराला पुरविण्यात आले. दरम्यान, आरती चौक परिसरात पाईपलाईन दुरूस्तीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे; पण या पाईपलाईनला लागूनच ११ केव्हीची विद्युत लाईन असल्याने महावितरण व नगर परिषद, हे काम संयुक्तरित्या पूर्ण करणार असल्याचे न.प. उपाध्यक्ष कमल कुलधरीया यांनी सांगितले.
पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ही पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामुळे गुरूवारपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. यामुळे शहरातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे झाले आहे. सहा दिवस नळ येणार नसल्याने नागरिकांत धास्ती पसरली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)