तळपत्या उन्हातही शहरात विजयाचा जल्लोष
By Admin | Updated: May 17, 2014 00:26 IST2014-05-17T00:26:22+5:302014-05-17T00:26:22+5:30
मतदानानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह लोकशाहीवर प्रगाढ विश्वास ठेवणार्या नागरिकांच्या मनात महिनाभर कुजबूज होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्याचे सर्व चित्र स्पष्ट होत

तळपत्या उन्हातही शहरात विजयाचा जल्लोष
पराग मगर - वर्धा मतदानानंतर सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांसह लोकशाहीवर प्रगाढ विश्वास ठेवणार्या नागरिकांच्या मनात महिनाभर कुजबूज होती. शुक्रवारी झालेल्या मतमोजणीत जिल्ह्याचे सर्व चित्र स्पष्ट होत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामदास तडस यांनी एकहाती आघाडी घेत विजय मिळविला. यामुळे शहरात भाजप कार्यालय व कार्यकर्त्यांत जल्लोष पाहायला मिळाला. नरेंद्र मोदी जिंदाबादचे नारे शहरात सर्वत्र ऐकावयास मिळत होते तर काँग्रेससह इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांत नाराजी दिसत होती. संपूर्ण भारताच्या निवडणुकांकडे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते. वृत्तवाहिन्यांमध्ये सकाळपासून निकाल दाखवायला सुरुवात झाली. भारतीय जनता पक्षाने सर्वत्र विजयी पताका फडकविल्याचे चित्र स्पष्ट होत होते. तरीही वर्धा लोकसभा मतदार संघात काय चित्र आहे. याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. याला कारणही खास होते. काँग्रेसचे सागर मेघे आणि भाजपाचे रामदास तडस यांच्यात सरळ लढत होती. कोण जिंकणार, याची गणितं महिनाभरापासून मांडली जात होती. जिल्ह्यात मोदीलाट येणार अशा चर्चा होत्या. शुक्रवारच्या निकालाने हे चित्र स्पष्ट केले. शहरात काही ठिकाणी मोदी लाटेवर रामदास तडस यांचा विजय झाल्याचे तर काही ठिकाणी हा काँग्रेस पक्षावरचा राग असल्याच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. चौकाचौकात प्रत्येकाच्या मोबाईलवर व्हॉट्स अँप, मॅसेजद्वारे परिस्थिती काय आहे, हे कळत चित्र स्पष्ट होत गेले. रामदास तडस यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होताच तळपत्या उन्हातही शहरात फटाक्यांची आतषबाजी व बँडच्या तालावर रॅली निघाली. भाजप कार्यकर्त्यांत जोष संचारला होता. नरेंद्र मोदी जिंदाबाद, आलं रे कमळ, अशा घोषणा शहरात घुमत होत्या. भाजप कार्यालयासमोर दिवसभर फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळाली.