पुलगाव शहरात उकिरड्यांची रास
By Admin | Updated: January 5, 2015 23:09 IST2015-01-05T23:09:47+5:302015-01-05T23:09:47+5:30
पुलगाव शहरात कचऱ्याचा विळखा पडला आहे. सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच, उकिरडे आणि यामुळे सुटणारी दुर्गंधी याचा सामना करताना पुलगाववासियांच्या नाकीनऊ आले आहे.

पुलगाव शहरात उकिरड्यांची रास
वर्धा : पुलगाव शहरात कचऱ्याचा विळखा पडला आहे. सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा खच, उकिरडे आणि यामुळे सुटणारी दुर्गंधी याचा सामना करताना पुलगाववासियांच्या नाकीनऊ आले आहे. डासांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने जनारोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील प्रमुख कार्यालय असलेला परिसर तर घाणीच्या विळख्यात सापडला आहे. शहरात विकासकामात सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र येथेही कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. परिणामी सौंदर्यीकरणाला बकालपणाचे स्वरूप आले आहे. पालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाकरिता प्रभावी मोहीम राबविण्याची गरज नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.
कचरा टाकण्यासाठी कचरा परिसरात कचरा कुंड्याही नसल्याने नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला काही अंतरावर कचरापेटीची व्यवस्था केल्यास इतरत्र विखुरलेला कचरा नजरेस पडणार नाही. काही भागात पालिका प्रशासनाने कचऱ्याचे ढोले ठेवले आहे. मात्र ही व्यवस्था तोकडी पडत असल्याचे दिसते.
कचरा व्यवस्थापनाकरिता निद्रिस्त पालिका प्रशासनाला कधी जाग येईल असा प्रश्न पुलगावकर उपस्थित करतात. यापुर्वी शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले होते. याकरिता कचऱ्याच्या समस्येवर गांभीर्याने तोडगा काढणे गरजेचे ठरते. कचऱ्याच्या ढिगांवर गुरे, बकरी, वराह असे प्राणी चाऱ्याचा शोध घेतात. प्लास्टिक पिशव्यांचे भक्षण केल्यामुळे या पशुंवर विपरीत परिणाम होताना दिसतात. याची दखल घेत कचरा निर्मुलन मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)