नागरी सुविधांपासून सर्कसपूर वंचित
By Admin | Updated: January 31, 2016 02:23 IST2016-01-31T02:23:34+5:302016-01-31T02:23:34+5:30
निम्न वर्धा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २३ गावांच्या जमिनी घेण्यात आल्या. यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले;

नागरी सुविधांपासून सर्कसपूर वंचित
पुनर्वसनाचे भिजत घोंगडे : निवेदने, आंदोलनांचाही परिणाम शून्य
आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पासाठी जिल्ह्यातील २३ गावांच्या जमिनी घेण्यात आल्या. यामुळे त्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले; पण सदर ग्रामस्थांना मुलभूत सुविधाच पुरविल्या नाहीत. यामुळे पुनर्वसनाचे भिजत घोंगडे आजही कायम आहे. सर्कसपूर येथील ग्रामस्थ नागरी सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत अनेकदा निवेदने दिली, आंदोलने केली; पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या प्रकारामुळे सर्कसपूर पुनर्वसन येथील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.
तालुक्यातील सर्कसपूर या गावात नागरी सुविधा पुरवाव्या, गावातील अन्य सुविधा त्वरित देण्यात याव्यात या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. यात संबंधित विभागाने माजी आमदार दादाराव केचे यांच्या मध्यस्थीने तसेच सात दिवसांच्या आत समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते; पण चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना नागरी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. गावातील समस्या सोडवाव्या, नागरी सुविधा पुरवाव्या, रस्ते, वीज, नाल्या, पाणी या मुलभूत सुविधांची पुर्तता करावी, या मागण्यांसाठी अनेकदा निवेदनेही देण्यात आलीत; पण संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचेच दिसून येत आहे.
प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता; पण युवकांचे वय निघून जात असताना त्यांना नोकऱ्या देण्यात आलेल्या नाहीत. प्रकल्पग्रस्तांच्या वयोमर्यादेचा शासन निर्णय फेब्रुवारी २००७ मध्ये काढूनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. सर्कसपूर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सर्कसपूर पुनर्वसन गावात प्लॉट व शासकीय जागेत घाणीचे साम्राज्य आहे. स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी पोच रस्ता नाही. शेडची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. शाळा, समाज मंदिर परिसराची डागडुजी करण्यात आलेली नाही. प्रवासी निवारा दुरवस्थेत असून ग्रामपंचायतची कामेही खोळंबलेली आहेत. गावात बाजार भरत नसल्याने मार्केट ओटे रद्द करून
त्या निधीचा वापर ग्रामस्थांसाठी करणे गरजेचे होते; पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. गावातील सांडपाण्याची व्यवस्था नाही. उदरनिर्वाह भत्ताही देण्यात आलेला नाही. न्यायालयातील प्रकरणे व्हीआयडीने मागे घ्यावी, ही मागणीही धूळखात आहे. सर्कसपूर व अहिरवाडा येथील घर बांधकामासाठी वर्धा व बाकळी नदीतून रेती काढण्याची मुभा देण्यात यावी व अन्य मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी सर्कसपूर येथील प्रकल्पग्रस्तांनी निवेदनातून केली आहे.
पुनर्वसन ठिकाणी अकरा नागरी सुविधा त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन संबंधित विभागाने दिले होते; पण त्या समस्या अद्याप सुटल्या नाही. यामुळे सर्कसपूर गावात नागरी सुविधा न पुरविल्यास ८ फेबु्रवारी रोजी टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाला सादर केलेल्या निवेदनातून दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)