अपेक्षांच्या भडिमाराने हिरावला चिमुकल्यांचा ‘बालहक्क’
By Admin | Updated: November 19, 2014 22:45 IST2014-11-19T22:45:21+5:302014-11-19T22:45:21+5:30
मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने

अपेक्षांच्या भडिमाराने हिरावला चिमुकल्यांचा ‘बालहक्क’
पराग मगर - वर्धा
मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने त्यांचे हक्क हिरावले जात आहे. यामुळे मुलांचे हक्क, कर्तव्ये व अधिकार यावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महिला व बालकल्याण विभागाद्वारे बालकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात़ त्यांच्या अधिकारांबाबत चर्चा होत आहे; पण मुलांचे अधिकार आधी मुलांना कळणे गरजेचे आहे. याबाबत बालहक्कदिनी घेतलेला धांडोळा़़़
मानवाधिकार, नागरी हक्क, ग्राहकांचा हक्क, महिलांना हक्क असे अनेक विषय सध्या चर्चिले जातात. जगात लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्या ही बालकांची आहे. तरीही बालकांचा हक्क या विषयाकडे सहज दुर्लक्ष केले जाते़ मुळात बालकांना गृहितच धरले जात असल्याने हा प्रकार होतो; पण युनिसेफ व इतरही संस्थांचे कार्य तसेच बालकांवर होत असलेले अत्याचार व त्यांचे बदलते आयुष्य यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये पुढाकार घेऊन बालहक्काचा करार मांडला. तेव्हापासून बालहक्कावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. या करारात एकूण ५४ कलमे अंतर्निहित असून अस्तित्व, संरक्षण, विकास आणि सहभाग या चार हक्कांमध्ये त्यांचा समावेश आहे. घरांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद काही अंशी कमी झाला असला तरी त्यांना गृहित धरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांचाही घरच्या निर्णयात काहीसा सहभाग असावा, ही बाबच न रूजल्याने महिला व बाल कल्याण विभागामार्फत बालकांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या योजना आदी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविली जाते. यासाठी सन २००० पासून बाल न्याय अधिनियमही तयार करण्यात आला़ आजची मुले उद्याचे नागरिक आहे, या दृष्टीने विचार व्हावा यासाठी बालविकास विभागाद्वारे प्रयत्नही होत आहे; पण मुलांना हक्काप्रती जागरुक होण्यासाठी बोलतं करणे व हक्काप्रती जागरुक करणे गरजेचे आहे़