हवामान बदलताच शेतकऱ्यांची लगबग सुरू
By Admin | Updated: June 13, 2014 00:22 IST2014-06-13T00:22:27+5:302014-06-13T00:22:27+5:30
रोहिणी नक्षत्रात पारा वाढतच गेल्याने शेतकामाला खिळ बसली होती. मृग नक्षत्राची छाया पडताच हवामानात झालेला बदल पाहता पुन्हा खरीपाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी त्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाला आाहे.

हवामान बदलताच शेतकऱ्यांची लगबग सुरू
घोराड : रोहिणी नक्षत्रात पारा वाढतच गेल्याने शेतकामाला खिळ बसली होती. मृग नक्षत्राची छाया पडताच हवामानात झालेला बदल पाहता पुन्हा खरीपाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी त्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाला आाहे. त्याला आता एका जोमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
गत दोन वर्षात अस्माणी संकटाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जरजर केले. रब्बी हंगामात आलेल्या गारपीटीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांवर सातत्याने असलेले आर्थिक मंदिचे सावट पाहता या वर्षीच्या खरीप हंगामाला सामोरे जातांना अनेक आर्थिक अडचणी येत आहे.
उन्हाळवाहीची कामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाचा सहारा घेतला असताना कपाशीचे डोबण झाले आहे. अशात भारनियमनाचा कालावधी वाढत असल्याने त्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे त्यांना पिकांनी पाणी देणे शक्य होत नसल्याने उमललेली रोपे वाढत्या पाऱ्याने करपण्याची वेळ आली आहे.
रखरखत्या उन्हामुळे रोहीणी नक्षत्रात होणारी कापूस लागवड दरवर्षी पेक्षा यावर्षीच्या हंगामात कमी प्रमाणात दिसून येते. जूनच्या ८ तारखेपासून मृग नक्षत्राला हत्ती वाहन घेवून सुरुवात झाली. या नक्षत्रात पाऊस येतोच असा शेतकऱ्यांचा पक्का समज आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी बियाण्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. पांदण रस्त्याची दुरवस्था पाहता पावसाळ्याच्या दिवसात शेतात बैलबंडी जात नाही अशा शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या गोठ्यावर रासायनिक खत सुरक्षीत ठेवण्यासाठी खताची खरेदी मोठ्या प्रमाणात केली खरेदी केली आहे. अशात त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी अजूनही कायम आहेच.(वार्ताहर)