सीसीटीव्हीचे डोळे मिटले

By Admin | Updated: January 3, 2015 01:56 IST2015-01-03T01:56:05+5:302015-01-03T01:56:05+5:30

शहरातील रस्त्यावर होत असलेल्या चैन स्रॅचिंगसह विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने बजाज चौक व आर्वी नाका परिसरात

CCTV's eyes disappeared | सीसीटीव्हीचे डोळे मिटले

सीसीटीव्हीचे डोळे मिटले

रूपेश खैरी  वर्धा
शहरातील रस्त्यावर होत असलेल्या चैन स्रॅचिंगसह विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने बजाज चौक व आर्वी नाका परिसरात जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाच्यावतीने संयुक्तरित्या निर्णय घेत दोन चौकात आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. त्या पैकी केवळ तीन कॅमेरे सुरू असून उर्वरीत पाच कॅमेऱ्याचे डोळे मिटले आहेत. या कारणाने त्याचा कुठलाही उपयोग होत नसल्याचे दिसते. या कॅमेऱ्याकरिता जिल्हा नियोजन समितीत प्रस्ताव सादर करण्यात आला होता; मात्र तिथून मंजुरी मिळाली नसल्याने स्पॉन्सरशिप मधून कॅमेरे खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे.
मध्यतंरी शहरात दुचाकीने येत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरांनी चांगलाच हैदोस घातला होता. या चोरट्यांना पकडणे जिल्हा पोलिसांकरिता आव्हान ठरले होते. चोरटे चोरी करताना कोणताही सुगावा सोडत नसल्याने त्यांना पकडणे कठीण जात होते. हे चोरटे कोणत्या मार्गाने येतात व कोणत्या मार्गाने जातात याचा कुठलाही सुगावा पोलिसांना नव्हता. या चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलिसांच्यावतीने सुरू होते; मात्र त्यांना अपयश येत होते.
या चोरट्यांचा सुगावा लागावा व शहरात घडत असलेल्या इतर गोष्टींवरही पोलिसांची नजर राहावी, याकरिता मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाने वरिष्ठांकडे सोपविला. यात शहरातील मुख्य चौक म्हणून बजाज चौक व आर्वी नाका चौकात हे कॅमेरे सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. ही संकल्पना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मांडली. या करिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्याशी संपर्क साधत जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तिथून मंजुरी मिळाली नसल्याने स्पॉन्सरशिप मधून कॅमेरे खरेदी करून ते लावण्यात आले.आता तीन कॅमेरे बंद असल्याने ते निरुपयोगी ठरत आहेत.
शहरातील दोन मुख्य चौकापैकी बजाज चौकात चार व आर्वी नाका परिसरात चार असे आठ कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यात चोरटे कैद होतील असे पोलिसांना वाटत होते. चोरटे कैद होण्याकरिता निदान हे कॅमेरे सुरू राहणे गरजेचे आहे. सध्याच्या स्थितीत आर्वी नाका परिसरातील दोन व बजाज चौक परिसरातील एक कॅमेरा सुरू आहे. या कॅमेरे चित्र जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या कंट्रोल रूमध्ये जोडलेल आहेत. यात आज चार कॅमेऱ्याचे चित्र दिसत असून बजाज चौकातील एक कॅमेरा दोन ठिकाणचे चित्र दाखवित आहे. बंद असलेले हे कॅमेरे केवळ चौकात असलेल्या वाहतूक नियंत्रक दिव्यांचे खांब राखत असल्याचे चित्र आहे.

Web Title: CCTV's eyes disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.