अवजड वाहने अपघातास कारण
By Admin | Updated: August 9, 2014 01:44 IST2014-08-09T01:44:35+5:302014-08-09T01:44:35+5:30
जिल्ह्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गापैकी एक वर्धा-नागपूर महामार्ग आहे. गत अनेक दिवसांपासून वर्धा पवनार मार्गादरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

अवजड वाहने अपघातास कारण
वर्धा : जिल्ह्यातील सर्वात वर्दळीच्या मार्गापैकी एक वर्धा-नागपूर महामार्ग आहे. गत अनेक दिवसांपासून वर्धा पवनार मार्गादरम्यान रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. वाहतूक विभागाने अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी सामान्य प्रवासी वर्गातून वारंवार केली जात आहे.
यवतमाळ-वर्धा-नागपूर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ चालते. नागपूरवरून आलेली वाहने वर्धा शहरात न जाता दत्तपूर बायपास वरून ती सरळ यवतमाळकडे वळती होतात. त्यामुळे शहरात वाहतुकीची कोंडी होत नाही. परंतु नागपूरकडून यवतमाळकडे जाणारी वाहने दत्तपूरच्या अलिकडे पवनार-वर्धा दरम्यान जागोजागी मुक्कामाला असतात.
वाहन चालक बिनधास्तपणे अवजड वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. रात्रभर ही वाहने या मार्गावर असतात. सकाळीही ती तशीच उभी असतात. या मार्गावर प्रवासी वाहतूकही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे उभ्या असलेल्या वाहनामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो.
हा प्रकार या मार्गावर आता नित्याचाच झाला आहे. नियमबाह्यपणे अशी वाहने रात्र-रात्र वाहतुकीच्या मार्गावर उभी ठेवणे धोक्याचे आहे. असेअसतानाही वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा वाहनांवर दंड ठोठाविण्याची मागणी जोर धरत आहे.
रात्रभर वाहने रस्त्यावर उभी करताना काही आवश्यक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. रात्री ये-जा करीत असलेल्या वाहनांना ही वाहने दिसत नाही. त्यामुळे ती उभी केल्यावर इंडिकेटर सुरू ठेवणे, गाडी रस्त्यावर येईल अशी उभी न करणे अशा अनेक नियमांचे पालन करणे आवश्यक असतानाही या नियमांचा पायमल्ली केली जात असल्याने ही वाहने अपघातास कारण ठरत आहे.(शहर प्रतिनिधी)
या मार्गावर वाहने उभी करताना नियमांची पायमल्ली करीत असतात. एकाला पाहून दुसरा, तिसरा असे करीत वाहनांच्या रांगा या मार्गावर उभ्या असतात.
रात्री या वाहनांखाली स्वयंपाक केला जातो. वाहने गेल्यावर ते उरलेले अन्न खान्यासाठी कुत्र्यांची गर्दी पहावयास मिळते.
हा मार्ग मुळातच वर्दळीचा आहे. मुख्य मार्गांपैकी एक असा हा मार्ग असल्याने प्रवासी वाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होते. या मार्गावर अशी वाहने उभी करणे धोक्याचे असून दुचाकी चालकांना यामुळे प्रवास करणे धोक्याचे होऊन जाते.
दुचाकी चालकांना वाहने उभी ठेवून असलेल्या परिसरातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
या मार्गाने लोखंडी वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. अनेक दा मर्यादेपेक्षा जास्त जड वाहतूकही या मार्गाने वारंवार होत असल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे पडत असतात.