जात ही भारतातील सर्वात घातक अंधश्रद्धा
By Admin | Updated: January 3, 2015 01:44 IST2015-01-03T01:44:07+5:302015-01-03T01:44:07+5:30
आत्मा, पुण्य, पुनर्जन्म या आधारावर आपल्या देशात जात दीर्घकाळापासून टिकली आहे. विशिष्ट जातीचे लोक बुद्धिमान आणि दुसऱ्या जातीचे लोक कमीबुद्धीचे समजले जातात.

जात ही भारतातील सर्वात घातक अंधश्रद्धा
आर्वी : आत्मा, पुण्य, पुनर्जन्म या आधारावर आपल्या देशात जात दीर्घकाळापासून टिकली आहे. विशिष्ट जातीचे लोक बुद्धिमान आणि दुसऱ्या जातीचे लोक कमीबुद्धीचे समजले जातात. याला कुठलाही वैज्ञानिक किंवा तात्विक आधार नाही. देशाच्या अखंडतेला जातीमुळे धोका निर्माण होत आहे. त्यामुळे जात ही सर्वात घातक अंधश्रद्धा आहे, असे प्रतिपादन अ. भा. अनिसचे जिल्हा संघटक पंकज वंजारे यांनी केले.
येथील कृषक शिक्षण संस्थाद्वारे आयोजित कार्यशाळेत ते वैज्ञानिक दृष्टिकोण आणि जादुटोणा विरोधी कायदा या विषयावर ते मार्गदर्शन करीत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हरिभाऊ विरूळकर तर अतिथी म्हणून अ.भा. अनिसचे कार्यकर्ते दशरथ जाधव, प्रा. सुधाकर भुयार, प्रा. दीपक चव्हाण, प्रा. श्यामप्रकाश पांडे, प्रा. दशरथ नांदुरकर आदी उपस्थित होते.
जादुटोणा विरोधी कायद्याची माहिती देताना वंजारे म्हणाले, जगात कुणीही चमत्कार करू शकत नाही. संतांनी सुद्धा चमत्काराला विरोध केला आहे. चमत्कार करून दाखवणाऱ्याला अ. भा. अनिसच्या वतीने २१ लाख रूपयाचे बक्षीस देण्याचे आवाहन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. जादुटोणा विरोधी कायद्याच्या १२ कलमांची उकल आपल्या विशेष शैलीत त्यांनी करून दिली. स्वत:च्या आर्थिक प्राप्तीकरिता लोकांना फसविणाऱ्यास, ठगविणाऱ्या भोंदुबाबा, तांत्रिक, मांत्रिक यांच्या विरूद्ध या कायद्याच्या कसा उपयोग करून घेता येईल याची माहिती त्यांनी दिली. दशरथ जाधव यांनी आर्वी परिसरात घडलेल्या भानामती, अंगात भूत येणे आदी घटनांची माहिती दिली. समाजाला जागृत करण्याकरिता विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. विरूळकर यांनी शासनाने पारित केलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अत्यंत प्रभावी असून प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन केले.प्रा. सुधाकर भुयार यांनी प्रस्ताविक केले. संचालन दर्शनकुमार चांभारे तर आभार विशाल येलेकर यांनी मानले. प्रा. संजय धनविजय, प्रा. डॉ. विजया मुळे, प्रा. अंजली देशमुख, प्रा. अरूणा रोडे, प्रा. मनोहर सूरज बारापात्रे, गोपाल कळंबे, आकाश बोरवार, श्रृतिका टाकोणे, माधुरी मोकडे आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)