भरधाव वाहनेही पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

By Admin | Updated: March 3, 2016 02:09 IST2016-03-03T02:09:07+5:302016-03-03T02:09:07+5:30

नागपूर-वर्धा राज्यमार्गावर या काही वर्षांत जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे, ही वाहने भरधाव असतात.

Carriage for fowl and flying vehicles | भरधाव वाहनेही पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

भरधाव वाहनेही पक्ष्यांसाठी कर्दनकाळ

अन्नाच्या शोधात महामार्गावर भरधाव वाहनांखाली चिरडले जातात पक्षी
वर्धा : नागपूर-वर्धा राज्यमार्गावर या काही वर्षांत जड वाहनांची वर्दळ वाढली आहे. विशेष म्हणजे, ही वाहने भरधाव असतात. अन्नाच्या शोधात भिरभिरणारे पक्षी या वाहनांना धडकून आपला जीव गमवित आहेत. यामुळे रस्त्यावर चिरडून गेलेल्या पक्ष्यांचे अवशेष पाहावयास मिळणे, आता नित्याचेच झाले आहे.
नागपूर राज्यमार्गावर वर्धा - पवनार या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बागायती शेती आहे. सोबतच या रस्त्याच्या दुतर्फा मोठ-मोठी कडुलिंबाची झाडे आहेत. त्यातच सध्या या शेतशिवारांमध्ये गहू, चना, ज्वारी आदी पिके उभी आहेत. अनेकांच्या शेतात तुरीही वाळत आहेत. त्यामुळे या शिवारांत अनेक पक्ष्यांचा अधिवास आहे. पक्षी अन्नाच्या शोधात सर्वात्र भिरभिर फिरत असतात. मोठी झाडे असल्याने या झाडावरच पक्ष्यांचा विसावा असतो; पण या मार्गावर जड वाहने भरधाव असतात. वाहनांच्या गतीमुळे हवेचे झोत पक्ष्यांच्या अंगावर येतात. यामुळे तोल सुटून अनेक पक्षी वाहनांना धडकतात. कधी-कधी त्यांच्या चाकाखाली चिरडले जातात. हा प्रकार येथे नित्याचाच झाला आहे. परिणामी, पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवासच धोक्यात आल्याचे चित्र आहे.
यातील काही वाहने ही खूप उंच साहित्य घेऊन जात असतात. हे साहित्य झाडांच्या फांद्यांना अडत असते. त्यामुळे फांद्या तुटूनही पक्ष्यांना इजा होते. त्यामुळे या मार्गावर धावत असलेल्या वाहनांच्या गतीला आवर घालणे गरजेचे झाले आहे.
शहरासह गावांमध्ये मोबाईलचे प्रचलन वाढले आहे. यामुळे ठिकठिकाणी टॉवर्स उभारले जात आहेत. यातून निघत असलेल्या चुंबकीय लहरींमुळे पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात पक्ष्यांचे प्रमाण नगन्य झाले आहे. लहान-मोठे पक्षी शेतशिवारांचा आधार घेत आहेत. येथे अन्न-पाण्याची सोय असल्याने पक्ष्यांसाठी हा अधिवास सोयीचाही आहे; पण भरधाव वाहने आता त्यांच्या मृत्यूस कारण ठरत आहेत. यामुळे पक्ष्यांची संख्या आणखीच कमी होत आहे. याकडे सर्वांनीच लक्ष्य देणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)

रस्त्यावरील अन्न खाताना जातो जीव
महामार्गावर धावत असलेल्या वाहनांमधून अनेक प्रकारच्या खाद्यान्नाची वाहतूकही होत असते. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने खड्ड्यांतून वाहने गेल्यावर गहू, डाळ आधी धान्य असल्यास ते मार्गावर सांडते. हे धान्य खाण्यासाठी पक्षी गर्दी करीत असतात. ये-जा करीत असलेली भरधाव वाहने चुकवून पक्षी दाणे टिपत असतात. वाहने चुकविण्याच्या नादात एखाद्या पक्ष्याला शेवटी आपल्या प्राणास मुकावे लागते. हा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यामुळे भरधाव वाहने पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे पक्षीप्रेमी सांगत आहेत.

Web Title: Carriage for fowl and flying vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.