तीन एकरातील ऊस जळाला
By Admin | Updated: January 20, 2015 00:10 IST2015-01-20T00:10:12+5:302015-01-20T00:10:12+5:30
येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते.

तीन एकरातील ऊस जळाला
जिल्ह्यात आगीच्या तीन घटना : केळझर येथे झोपडीचा कोळसा
सेलू : येथील शेतकरी शंकर अर्जुन झाडे यांच्या तीन एकर शेतातील ऊसाचे पीक वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे जळून खाक झाले आहे. घटनेच्या वेळी झाडे व त्यांचा शेतमजूर शेतातच हजर होते. झाडे यांच्या शेतातून थ्री फेज लाईन गेलेली आहे. त्याच लाईनवरून ११ हजार किलो मेगावॅटची मेनलाईन सुद्धा गेलेली आहे. त्यांच्या शेतात विजेचे तार लोंबकळले असून या तारांत झालेल्या घर्षणामुळे ठिणगी पडून आग लागल्याचा आरोप झाडे यांचा आहे. या आगीत त्यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची तक्रार सेलू पोलिसात दिली असून एएसआय वर्धापूरकर यांनी पंचनामा करून प्रकरण विद्युत विभागाकडे पाठविले आहे. या प्रकारामुळे वीज वितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. झाडे यांना महावितरणच्यावतीने मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
६० हजार रुपयांच्या रोखीसह साहित्याची राख
केळझर : येथील एका शेतमजुराची झोपडी अचानक जळाल्याने त्याचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत साठ हजार रुपये रोख असल्याचे सांगण्यात आले आहे. ही घटना रविवार सायंकाळी घडली.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील हिरडा येथील बालाजी लालाजी कजदेकार व कशीराम बिसराम बेटेकार हे शेतमजुरी करण्याकरिता येथे आले आहेत. बालाजी काजदेकर हे ठेक्याने शेती करतात तर काशीराम बेटेकार हे गावातीलच अरुण ठोंबरे याच्याकडे शेतमजुरी करतो. घटनेच्या दिवशी सर्व कुटुंबीय शेतावर गेले असताना आगीत संपूर्ण झोपडी भस्मसात झाली. (वार्ताहर)
आशा इंडस्ट्रीजला आग
समुद्रपूर : जाम येथील आशा इंडस्ट्रीजमध्ये अचानक विद्युत प्रवाह वाढल्याने लागलेल्या आगीत ३०० पोते सरकी व बारदाणा तसेच यंत्रसामग्री जळून खाक झाली. ही आग शनिवारी रात्री लागल्याचे सांगण्यात येते.
जाम येथे आशा इंडस्ट्रीजनामक शेतीमाल प्रक्रिया उद्योग कार्यरत आहे. येथील उद्योगाला होणारा विद्युतपुरवठा शनिवारी कमी जासत होत होता. रात्रीच्या सुमारास अचानक शॉट सर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत तेथे असलेली कॅबिन जळून स्वाहा झाली. आगीमुळे सरकी भरण्याकरिता ठेवून असलेला बारदाणा व सरकी भरलेली पोते जळावयास लागले. कार्यरत कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंगणघाट नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारन करण्यात आले.
आगीमुळे सुमारे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा प्राथमिक पंचनामा रविवारी पूर्ण केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)